⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

…तर जळगावात आपला खासदार निवडून येईल ; संजय राऊत

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२१ । जळगावच्या दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसैनिकांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.  सत्ता आली म्हणून माजू नका आणि सत्ता गेली म्हणून लाजू नका. जोरात काम केले तर जळगावात आपला खासदार निवडून येईल, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते आज जळगावमध्ये असून त्यांच्या उपस्थितीत जळगाव महानगर शिवसेनेची आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.

जळगावच्या सुवर्णनगरीचा कोळसा झाला

संजय राऊत यावेळी म्हणाले की, शिवसेना या चार अक्षरांमध्ये चमत्कार आहे. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानेच आपण पुढे जात आहात. जळगावमध्ये सत्तांतर होत असताना ते नगरसेवक कुठून आले, कसे आले, हे आता महत्त्वाचे नाही. आज जळगावच्या सुवर्णनगरीचा कोळसा झाला आहे. ही परिस्थिती सुधारली पाहिजे. जो उत्तम पद्धतीने महानगरपालिका चालवतो तो राज्यही चालवू शकतो. मुंबई मनपानंतर आता उद्धव ठाकरे हे राज्य चालवत आहेत, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

गुलाबराब पाटलांचं कौतुक

पुढे बोलताना ते म्हणाले की, पती विरोधी पक्षनेता आणि पत्नी महापौर असा योगायोग असलेली जळगाव महानगरपालिका ही देशातील पहिलीच महानगर पालिका असेल. शिवसैनिकांनो सत्ता आली म्हणून माजू नका आणि सत्ता गेली म्हणून लाजू नका, जोरात काम केलं तर जळगावमध्ये आपला खासदार निवडून येईल. गुलाबराव पाटील यांनी जबाबदारी घेतली की ते पार पाडतात, अशा शब्दात संजय राऊत यांनी यावेळी गुलाबराब पाटील यांचेही कौतुक केले.