जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२५ । आषाढीसाठी राज्यभरातून शेकडो पालखी सोहळे पायी चालत विठ्ठलाच्या पंढरीत दाखल होतात. दरम्यान आदिशक्ती मुक्ताई आषाढी वारी पालखी सोहळा ६ जूनला प्रस्थान होणार आहे. ६ जिल्ह्यांमधून ६०० किमी पायी प्रवास आणि २८ ठिकाणी मुक्काम करून हा पालखी सोहळा ३ जुलैला पंढरपुरात दाखल होईल. सजवलेला रथ आणि संत मुक्ताबाईंच्या चांदीच्या पादुका या सोहळ्याचे मुख्य आकर्षण आहे. सुमारे दोन हजार वारकऱ्यांच्या सहभागाचा अंदाज आहे.

संत मुक्ताईंच्या आषाढी वारीचे यंदाचे ३१६ वे वर्ष आहे. कोथळी येथील संत मुक्ताईंच्या मूळ मंदिरातून ६ जूनला दुपारी ३ वाजता पालखी वारीचा पंढरपूरच्या दिशेने प्रवास सुरू होईल पहिलाच मुक्काम तीन किमी अंतरावरील मुक्ताईनगर येथील संत मुक्ताईच्या नवीन मंदिरात होईल. दरम्यान, वारीला निघण्यापूर्वी मुक्ताईच्या रथाची सुंदर फुलहारांनी सजावट केली जाते. त्यात चांदीच्या पादुका ठेवल्या जातात. नवीन मंदिरात पहिला मुक्काम झाल्यावर हा सोहळा विदर्भातील बुलडाणा मार्गे मराठवाड्यातून पुढे पंढरपूरकडे जातो.
या पालखी सोहळ्यात जळगाव जिल्ह्यासह खान्देश, विदर्भातील अनेक ठिकाणचे वारकरी सहभागी होतात. दरम्यान पालखी सोहळ्यासोबत पोलिसांचा बंदोबस्त तसेच आरोग्य पथक रुग्णवाहिकेसह तैनात असेल. पाण्याचे चार टँकर देखील सोबत असतील. दिंडीतील वारकरी व भाविकांसाठी फिरते शौचालय पुरवण्यात येईल. जेणेकरून वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही.
पालखीचा रात्री मुक्काम असलेली गावे :
मलकापूर, मोताळा, बुलडाणा, येळगाव, चिखली भरोसा फाटा, देऊळगाव मही, देऊळगाव राजा, कन्हैया नगर जालना, काजळा फाटा, अंबड, वडी गोद्री, गेवराई, पाडळसिंगी, नामलगाव फाटा, बीड माळवेस हनुमान मंदिर, बीड बालाजी मंदिर, पाली, वानगाव फाटा, पारगाव, वाकवड, भूम, जवळा, शेंद्री, माढा, आष्टी, पंढरपूर.