⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

१०० च्या टार्गेटवरून शिवसेना संपर्कप्रमुखांनी जिल्हा प्रमुखांना खडसावले!

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२२ । शिवसेनेवर सध्या धर्मसंकट येऊन पडले असून एक-एक पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील तीच परिस्थिती असून पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते बांधून ठेवण्यासाठी निष्ठा पत्र भरून घेतले जात आहे. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत (Sanjay Sawant ShivSena) यासाठी सतत आढावा घेत आहेत. मंगळवारी जळगावात आढावा घेत असताना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे (Vishnu Bhangale Jalgaon) यांनी केवळ १०० निष्ठा पत्र (ShivSena Nishta Patra) भरून घेण्याचे टार्गेट घेतल्याने त्यांना चांगलेच खडसावल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली आहे.

शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्याने अख्खी शिवसेना फुटली. राज्यात सध्या शिवसेना विरुद्ध शिंदे सेना असे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे एकनाथ शिंदे शिवसेनेला धक्क्यावर धक्के देत असताना दुसरीकडे शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत शिंदे गटात सामील होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. शिवसेनेला लागलेली गळती रोखण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहे. आदित्य ठाकरे राज्यभर निष्ठा यात्रेवर निघाले असून राज्यभरातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून १०० रुपयांच्या स्टॅम्पवर निष्ठा पत्र भरून घेतले जात आहे.

जळगाव जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत व विलास पारकर (Vilas Parkar ShivSena) दोन्ही पक्ष बांधणीसाठी कामाला लागले आहे. जळगावात काढण्यात आलेल्या भव्य आक्रोश मोर्चाप्रसंगी संजय सावंत आठ दिवस तळ ठोकून होते. जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना पक्ष बांधणीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख, महानगर प्रमुख यांच्यावर देखील जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मंगळवारी जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत तीन दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर आले. जळगाव शहरातून १००० निष्ठा पत्र भरून घेण्याचे टार्गेट महानगरप्रमुख शरद तायडे (Sharad Tayade ShivSena Jalgaon) यांनी घेतले तर जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी १०० चे टार्गेट सांगितले असता सावंत यांनी त्यांची चांगलीच कानउघडणी केली.

१०० निष्ठा पत्रांवर संघटना पुढे नेणार का? असा सवाल जिल्हा संपर्क प्रमुखांनी कान उघडणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच त्यानंतर जिल्हा प्रमुखांना २ हजार निष्ठापत्र भरून घेण्याचे टार्गेट देण्यात आले. दरम्यान, याबाबत जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत व जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांच्याशी याबाबत जळगाव लाईव्ह न्यूजने संपर्क साधला असता त्यांनी असे काही झाले नसल्याचे सांगितले. भंगाळे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत सावंत यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले आहे.