⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

सरकारमध्ये राजकीय गोंधळ : सीएमओचे स्पष्टीकरण, निर्बंध हटवले नाही

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२१ । राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील लॉकडाऊन ५ टप्प्यांत हटवण्यात आल्याचा निर्णय पत्रकार परिषद घेऊन दुपारी ४.३० वाजता जाहीर करण्यात आला. त्यानंतर जनसंपर्क विभागामार्फत सायंकाळी ६.३० वाजता राज्यात अनलॉक नसल्याची माहिती माध्यमांना देण्यात आली. हा प्रस्ताव फक्त विचाराधीन आहे, त्यावर अजून निर्णय झालेला नाही, असे स्पष्टीकरण सीएमओ म्हणजेच मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आले.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अगदी ही अनलॉकची प्रक्रिया कशी असणार? कोणत्या जिल्ह्यात काय सुरु असणार? ही माहिती देखील दिली होती. यानंतर अचानक मुख्यमंत्री कार्यालयाकडून केवळ विचाराधीन असल्याचे सांगण्यात आल्याने नागिरकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रमाचे वातावरण आहे.

कोरोना संदर्भात जनता संवेदनशील आहे. यामुळेच दहावीनंतर आज बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने म्हणजेच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीच जाहीर केला. परंतु त्यानंतर राज्य अनलॉक सुरु करण्यात येत असल्याची सर्वांना अचंबित करणारी घोषणा केली. संवेदनशील विषयावर सरकारमध्ये समन्वय नाही, प्रत्येक गोष्टीत चढाओढ सुरु आहे, असा राजकीय प्रकार दिसून आला.

यावरून एकच दिसून येत आहे कि कोरोनासारख्या संवदेनशील विषयावर तीन पक्षाच्या सरकारमधील या गोंधळाने राज्यातील जनता भरडली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांना न सांगता एखादा मंत्री इतकी मोठी घोषणा कशी करु शकतो? हाच प्रश्न आज राज्यातील जनतेला पडला आहे.