⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

शेतकऱ्यांना दिलासा : ई-पिक नोंदणीला मुदतवाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । शेतातील उभ्या पिकांचा फोटो घेऊन पिकाची माहिती थेट तलाठी यांना पाठविण्याची सुविधा ई-पीक पाहणीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अद्यापही काही शेतकऱ्यांना माहिती भरता आलेली नाही, त्यामुळे शासनाकडून ई-पीक पाहणीच्या माध्यमातून ई-पीक नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी का होईना दिलासा मिळाला आहे.

शेतातील पिकांची माहीती अर्थात पीकपेरा स्वत: मोबाईलमधील अ‍ॅपच्या माध्यमातून नोंदवुन तलाठ्यापर्यत पोहचविण्याचा ई-पीक पाहणी कार्यक्रम १५ ऑगस्टपासुन राज्यभरात राबविण्यात येत आहे. आतापर्यत ७० लाख शेतकऱ्यांनी मोबाईलमधील अ‍ॅपच्या माध्यमातुन आपापल्या शेतातील पिकनोंदणी यशस्वीरीत्या नोंदवली आहे. दि.३० सप्टेंबरपर्यत खरीपातील पिकांची ई-पिक नोंदणी करण्याची मुदत देण्यात आली होती, मात्र राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच तांत्रिक अडचणीमुळे असंख्य शेतकरी पिकपेऱ्यांची नोंदणी अद्यापर्यत करु शकले नाही. दरम्यान, शेतकऱ्यांना उद्भभवलेल्या समस्या व अडीअडचणी लक्षात घेत प्रशासनाकडुन दि.१४ ऑक्टोबरपर्यत ई-पिक नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे.

लाभ घेण्याचे आवाहन
राज्यस्तरीय अंबलबजावणी समितीची बैठक दि.३० सप्टेंबर रोजी सपन्न झाली. बैठकीमध्ये राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी मोबाईलद्वारे नोंदणी करण्यास अडचणी निर्माण झाल्यामुळे सन २०२१-२२ चा खरिप हंगामातील पीक पहाणी मोबाईल अ‍ॅपद्वारे करण्यासाठी दि.१४ ऑक्टोबरपर्यत मुदतवाढ देण्यात आली. या सुविधेचा शेतकरी बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.