⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | राजपूत समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका ; माजी खा.डॉ. उल्हास पाटलांचा सरकारला इशारा

राजपूत समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका ; माजी खा.डॉ. उल्हास पाटलांचा सरकारला इशारा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२३ । राजपूत समाजाने विविध मागण्यांबाबत जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषण पुकारले असून त्यांच्या या आंदोलनाला जिल्ह्यातून मोठा पाठींबा मिळत आहे. याच दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्यासह काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील यांनी आंदोलनस्थळी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी डॉ. उल्हास पाटील यांनी राजपूत समाजाच्या आंदोलनाला प्रदेश काँग्रेसचा पाठींबा असल्याचे जाहीर करत राज्य सरकारने राजपूत समाजाच्या मागण्या त्वरीत मान्य कराव्या, राजपूत समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका असा गर्भित इशारा दिला.

राजपूत समाजाला जात वैधता प्रमाणपत्र मिळावे यासह विविध मागण्यांसाठी राजपूत समाजाचे गिरीशसिंह परदेशी व रोशनसिंह राजपूत यांच्यासह समाजबांधवांनी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषण पुकारले आहे. आंदोलनस्थळी माजी खासदार डॉ उल्हास पाटलांनी भेट दिली.

याप्रसंगी बोलताना डॉ.पाटील यांनी सांगितले की, राज्याच्या उभारणीत राजपूत समाजाचेही मोठे योगदान असून ऐतिहासिक परंपरा लाभलेला हा समाज आहे. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राजपूत समाजाच्या महासंमेलनात केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजपूत समाजाच्या मागण्या मान्य करीत भामटा शब्द काढण्याचे आश्‍वासन दिले होते.

या आश्‍वासनाची अद्यापपर्यंत अंमलबजावणी मात्र झालेली नाही. राज्यातील हे सरकार केवळ आश्‍वासने देत असून त्यावर कुठलीही अंमलबजावणी करीत नाहीये. सहा दिवसांपासून राजपूत समाजाचे हे आमरण उपोषण सुरू आहे. राज्य सरकारने त्यांच्या संयमाचा अंत न पाहता त्वरीत मागण्या मान्य कराव्या असा इशाराही प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.