जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२२ । राज्यात सध्या पावसाने उघडीप दिली आहे. मात्र अशातच राज्यात 1 ऑगस्ट, पुढचे 3,4 दिवस राज्यात काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. यात 4,5 व्या दिवशी कोकणात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात ५ आणि ६ ऑगस्टला चांगला पाऊस येईल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे. या दोन्ही दिवशी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात यंदा पावसाने जून महिन्यात दडी मारल्याने पाऊस होईल का नाही अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु जुलै महिन्यात झालेल्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. कोकण, मध्यमहाराष्ट्र, विदर्भात पावसाने अक्षरशः थैमान घातले होते. मात्र गेल्या एकही दिवसापासून राज्यात पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळतेय. मात्र अशातच आता हवामान खात्याने पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

‘या’ भागाला यलो अलर्ट
2 ऑगस्ट : आज दिनांक 2 ऑगस्ट रोजी वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि अमरावती या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून या भागाला यलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
3 ऑगस्ट – दिनांक 3 ऑगस्ट रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, नांदेड, बीड, हिंगोली या भागात मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे या भागाला यलो अलर्ट दिनांक 3 ऑगस्ट रोजी हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
4 ऑगस्ट – तर दिनांक 4 ऑगस्ट रोजी नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड आणि जालना या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची (Weather Update) शक्यता आहे. दिनांक 4 ऑगस्ट साठी या भागाला हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच जळगाव जिल्ह्यात ५ आणि ६ ऑगस्टला यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. त्यानुसार पुढच्या तीन ते चार दिवसात जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आहे. सध्या राज्यासह जळगाव जिल्ह्यात उघडीप दिल्याने उन्हाचा उकाडा वाढला आहे. त्यात पावसाने विश्रांती घेतल्याने पिकांवर औषध फवारणी, कोळपणीचे कामे सध्या शेतात सुरु आहेत. मात्र आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकर्यांची धाकधूक वाढली आहे.











