जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२५ । गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार कोसळत थैमान घालणाऱ्या पावसाने आता काही काळ विश्रांती घेतली आहे. महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. मात्र राज्यात ऐन दिवाळीत म्हणजे १७ ते १९ ऑक्टोबरदरम्यान पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात शेती पिकांचे मोठं नुकसान झाले. हाता तोंडाशी आलेलं पीक निसर्गाने हिरावून घातल्याने शेतकरी हवालदिल झाला. तर शेतकऱ्यांना सरकारकडूनही मदत जाहीर करण्यात आलीय. मात्र यातच आता राज्यातून लवकरच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार आहे. यादरम्यान राज्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्यामुळे शेतकऱ्याची चिंता पुन्हा वाढली आहे.

हवामान खाते आणि हवामान अभ्यासकांच्या मते ऐन दिवाळीत म्हणजे १७ ते १९ ऑक्टोबरदरम्यान मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस पडण्याचा अंदाज आहे. केरळ, तामिळनाडू या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असल्याने हा पाऊस पडणार आहे, असे हवामान अभ्यासकांनी सांगितले. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून जळगावसह काही जिल्ह्यांत पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, मान्सून परतीचा प्रवास सुरू करताना या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.







