जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२५ । राज्यात मान्सून पूर्व पावसाचे थैमान सुरु असून यातच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील ४८ तासांत राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.याच पार्श्वभूमीवर आज मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर जळगाव जिल्ह्यातही अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राच्या तीव्रतेमुळे महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाने जोर धरला आहे. हवामान विभागाने आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे, या भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच, लातूर, नांदेड, बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांत जोरदार वादळी पावसाचा अंदाज असल्याने या जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात वादळी पावसामुळे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात कुठे कुठे पावसाचा इशारा ?
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आजही जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मागच्या 48 तासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचं हाहाकार माजवला आहे. पुढील ४८ तास जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिकच्या घाटमाथ्यावर, पुणे , अहमदनगर, कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.