जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२२ । राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं. तसेच वाहतुकीवर देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज देखील राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पाहता, पुढील तीन ते चार दिवस विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामानासह, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

जळगाव जिल्ह्यात गणपती विसर्जनाच्या दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसापूर्वी म्हणजेच सोमवारी जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नद्या, नाले वाहू लागले आहेत. जिल्ह्यातल्या ७ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. या पावसानं कापूस, मका ही पिकं धोक्यात आली आहेत, तर सर्वसामान्य जनजीवनही विस्कळीत झालं आहे. जळगाव जिल्ह्याला २३ सप्टेंबरपर्यत वादळीवारा अन् विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यानंतर जिल्ह्याला ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, काल मंगळवारी जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र परतीच्या पावसाच्या दरम्यान, अजून काही दिवस पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.
यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?
यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्हाला तत्काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्ही ठिकाण आणि तुमच्या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.











