जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२८ । महागाईमुळे त्रस्त झालेल्या गृहिणींना दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजे वर्षभरात डाळींच्या दरात घसरण झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत डाळींच्या दरात २० ते ५० रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. यात सर्वाधिक तुरीच्या डाळीचे दर कमी झाले. गेल्यावर्षी १६० रुपये किलो असणारी डाळ यंदा ११० रुपये किलो आहे.

बाजारात नवीन डाळींची आवक सुरू झाली असून, यंदा उत्पादन अधिक झाल्याने डाळी स्वस्त झाल्या आहेत. तूर डाळीच्या दरात ५० रुपयांनी घसरण झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला. तूर डाळ ४० रुपयांनी तर तांदूळ १० ते २० रुपयांनी घसरला असल्याने आता वरण-भात स्वस्त झाला आहे. मुबलक आवक, उत्पादन अधिक झाल्याने सध्या डाळींचे भाव कमी झाले आहेत. सध्या सर्वप्रकारच्या डाळी ८० ते १२० रुपये किलोने विकल्या जात आहेत. गेल्या वर्षी तुलनेत यंदा पाऊस चांगला झाल्याने सर्वच धान्याचे उत्पादन वाढले. त्यातही कडधान्याच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्याचे सांगण्यात येते.

असे आहेत डाळींचे किलोचे दर?
तूरडाळ पांढरी – १६० (जून २०२४).. आता ११०
उडीद डाळ – १४० (जून २०२४).. आता ११०
मूग डाळ- १२० (जून २०२४).. आता १२०
उडीद काळी डाळ – १३० (जून २०२४).. आता १००
चणा डाळ – १०० (जून २०२४).. आता ८०
मठाची डाळ – १४० (जून २०२४).. आता ११०







