अर्थसंकल्पात भुसावळ विभागातील रेल्वे प्रकल्पांना 855 कोटींची तरतूद; आता हे कामे होणार..
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२४ । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी देशाचा व रेल्वेचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र रेल्वेसाठीच्या तरतुदींची माहिती दुसऱ्या दिवशी बुधवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून जाहीर करण्यात आली. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पाला १५ हजार ९४० कोटींचा निधी देण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितली. दरम्यान या निधीपैकी ८०० कोटींपेक्षा जास्त निधीची तरतुद भुसावळ विभागातील विविध कामांसाठी केली आहे. यामुळे आता रेल्वे प्रकल्पांना चांगली गती प्राप्त होणार आहे.
भुसावळ विभागातील ही कामे होणार?
यंदाच्या अर्थसंकलपात भुसावळ विभागातील विविध कामांसाठी रेल्वे प्रशासनाने ८५५ कोटींच्या निधीची तरतुद केली आहे. यामध्ये पाचोरा-जामनेर नॅरो गेजचे रूपांतरण ब्रॉडगेज करण्यासाठी ३०० कोटींची, तर जळगाव ते मनमाड तिसऱ्या लाइनसाठी १२० तर जळगाव ते भुसावळ दरम्यान चौथ्या लाइनसाठी ४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक इती पांडे यांनी दिली.
तसेच वाहतूक सुविधा आणि इतर कामांमध्ये गायगाव लांब हॉल ट्रेनच्या हाताळणीसाठी यार्ड पुनःसंरचना ४.२५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. तर निफाड आरओबीमध्ये ५ कोटी रुपयांचा निधी, भुसावळ ते बडनेरा दरम्यान साईड ट्रेनसाठी वेगळी अप आणि डाऊन मुख्य लाईनवरील प्लॅटफॉर्मवर ११ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. धुळे (बोरविहीर) नरडाणा या ५०.६ किमीमीटर लांबीच्या रेत्वे लाईनसाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.