⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

शेतकऱ्यांनो.. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा अजूनही घेतला नाहीय लाभ, ही आहे शेवटची तारीख

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२२ । शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई आणि नफा मिळावा, या दृष्टीने कमी प्रीमियममध्ये पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीसाठी अल्प प्रीमियमवर विमा संरक्षण दिले जाते. दरम्यान, यावर्षीच्या खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे स्वरूप जाहिर करण्यात आले असून या योजनेत जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी ३१ जुलैपर्यंत या पीक विमा योजनेत सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा कृषि अधिक्षक संभाजी ठाकूर यांनी केले आहे.

राज्यातील राजकीय अस्थिरपरिस्थितीमुळे खरीप पीक विमा योजनेची प्रतिक्षा शेतकर्‍यांकडून केली जात होती. यासाठी खरीप पिकांसाठी विमा रकम, प्राधिकृत करण्यात आलेली विमा कंपनी याविषयी कोणतीही स्पष्टता झालेली नसल्याने शेतकरीवर्गात व्दिधा परिस्थिती दिसून येत होती. परंतु केंद्र शासनस्तरारून यावर्षीच्या खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे स्वरूप जाहिर करण्यात आले असून या योजनेत जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी ३१ जुलैपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामातील ज्वारी पिकासाठी विमा संरक्षीत रकम २४ हजार असून (शेतकरी हिस्सा -४८० रूपये), बाजरी २० हजार रूपये (४०० रू.), सोयबीन पिकासाठी ३६ हजार रूपये ( ७२० रू.), भुईमूग ३२ हजार (६४० रू.), तीळ २२ हजार रू.(४४०), उडीद, मुग २० हजार रू.(४००रू.), तुर २५ हजार रू.(५००रू.), कापूस ४० हजार रू.(२हजार रू.) आणि मका २६ हजार २००रू. (५२४ रू.) अशी संरक्षित रकम आणि पीक विमा रकम संरक्षण आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी ऍग्रीकल्चर इन्शूरन्स कं. ऑफ इंडिया आणि जिल्हा प्रतिनिधी कुंदन बारी यांची नियुक्ती केली आहे. विकासो चे सभासद असलेले कर्जदार अथवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना ऐच्छिक असून जे कर्जदार शेतकरी या योजनेत सहभागी होणार नसल्याचे स्वयंघोषणापत्र स्वाक्षरीसह सादर करणार नाहीत ते शेतकरी या योजनेत सहभागी आहेत असे समजले जाईल. यासाठी तालुका, मंडळ अथवा उपविभागीय कृषि कार्यालय तसेच जिल्हा बँक कार्यांलयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कृषि अधिक्षक कृषी विभाग जळगाव यांनी केले आहे.