⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

‘त्या’ पोलीस निरीक्षकांनी मागितली वारकरी संप्रदायाची माफी

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२२ | चाळीसगाव येथे घडलेल्या घटनेबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे, अनावधानाने बुटासहित त्या गादि पर्यंत गेलो, त्याचे महत्व काय आहे याबद्दल देखील माहिती नहोते, यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो असे पोलीस निरीक्षकांनी म्हटले आहे.

चाळीसगाव शहरातील हनुमानसिंग राजपूत परिसरात सप्तश्रृंगी मंदिराजवळ रात्रीच्या वेळी माईक व स्पीकर लावून कीर्तन सुरू असल्याने शहर पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी ते कीर्तन बंद पाडले होते. शिवाय ते बूट घालून नारदाच्या गादीवर चढले होते. यावेळी त्यांनी वारकरी संप्रदायाला खडेबोल सुनावले. यामुळे भाविकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत होती. पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या वागणुकीमुळे वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या होत्या. अधिकाऱ्यांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा आम्ही राज्यव्यापी आंदोलन छेडू असा इशारा देखील वारकऱ्यांनी दिला होता. याबाबत पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी माफी मागितली असून त्यांनी सांगीतले कि, लाऊडस्पिकर बाबत शासनाने जे आदेश दिले आहेत त्यानुसार आम्ही तेथे माहिती देण्यासाठी थेट माईक जवळ गेलो होतो. अंगात शासकीय वर्दी होती पायात बूट होते. दहा वाजेच्या आत कीर्तन आटपावे सांगण्यासाठी गेलो होतो. स्टेज वर नारदांची गादी होती त्याबद्दल मला काहीच माहिती नहोते यामुळे अनावधानाने बुटासहित त्या गादि पर्यंत गेलो, त्याचे महत्व काय आहे याबद्दल देखील माहिती नहोते, कर्तव्य बजावत असताना अनावधानाने पाय पडले. या मुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो असे पोलीस निरीक्षकांनी बोलताना सांगितले.