⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

प्रवाश्यांनो लक्ष द्या : धावत्या गाडीत चढणे, उतरणे टाळा

जळगाव लाईव्ह न्यूज । मिशन जीवन रक्षक । रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी केवळ रेल्वेतील गुन्हेगारी रोखणे, मालमत्तेचे रक्षण करण्यासाठीच नव्हे तर संकटात सापडलेल्या प्रवाशांचे प्राण वाजवण्यासाठी ‘मिशन जीवन रक्षक’ हा उपक्रम राबवतात. या अंतर्गत भुसावळ विभागात गेल्या पाच महिन्यांत गाडीत चढताना अथवा उतरताना किंवा निष्काळजीमुळे जीव धोक्यात सापडलेल्या ६ प्रवाशांचे प्राण आरपीएफच्या सतर्कतेमुळे वाचवण्यात आले. तर मध्य रेल्वेच्या भुसावळ, नागपूर, पुणे, मुंबई वसाेलापूर या विभागात ३१ प्रवाशांचे प्राण वाचवणे शक्य झाले. यापैकी १६ घटना मुंबई विभाग, भुसावळ आणि नागपूर प्रत्येकी ६, पुणे २ आणि सोलापूर विभागात एका प्रवाशाला मृत्यूच्या दाढेतून आरपीएफने बाहेर काढले. भुसावळ विभागात आरपीएफ आयुक्त क्षितिज गुरव, सहायक आयुक्त डी.पी. कुशावह यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन जीवन रक्षक हा उपक्रम राबवला जातो.

२४ एप्रिल २०२२ रोजी पहाटे २.१० वाजता एका प्रवाशाला खांडवा स्थानकावर उतरायचे होते. मात्र, गाडीने खांडवा स्थानक सोडल्यावर त्यांना झोपेतून जाग आली. यामुळे गोंधळलेल्या स्थितीत त्यांनी चालत्या गाडीतून प्लॅटफॉर्मवर उडी मारली. यात त्यांच्या जीवावर बेतण्याचा धोका पाहता आरपीएफ विनोदकुमार यांनी तत्काळ मदतीचा हात दिला. यामुळे त्यांचा जीव वाचला.

११ एप्रिल २०२२ रोजी डाऊन पाटलीपुत्र एक्स्प्रेस सकाळी ७ वाजता भुसावळहून सुटली. या गाडीत चुकीने बसलेल्या प्रवाशाने खाली उतरण्याचा प्रयत्न करताच तो प्लॅटफॉर्म व गाडीच्या मधोमध पडला. हा प्रसंग पाहून सहायक उपनिरीक्षक दीपक कवले, महेश तायडे यांनी प्रवाशाला बाहेर काढून जीवदान दिले.

मुंबईला जाणारा एक प्रवासी २० जानेवारी २०२२ रोजी खांडवा स्थानकावर गोरखपूर-एलटीटी गाडीतून प्लॅटफॉर्म व रेल्वे रुळांमधील गॅपमध्ये पडला. आरपीएफ उपनिरीक्षक देवेंद्र कुमार, महिला कर्मचारी उर्मिला सिकरवार यांनी गार्डकडे धाव घेत गाडी थांबवली. प्रवाशाला गाडीखालून बाहेर काढत उपचार केले.

खंडवा येथे ३१ डिसेंबर २०२१ रोजी राणी मनीष सिंह (रा.मंगळुरू) ही महिला मंगला एक्स्प्रेस ऐवजी चुकून दुसऱ्या गाडीत बसली. त्यामुळे धावत्या गाडीतून खाली उतरताना त्या गाडी व प्लॅटफॉर्मच्या मधोमध पडल्या. आरपीएफ सुनील यादव, श्रीपाल मलिया, माधव सिसोदिया यांनी त्यांना शिताफिने बाहेर काढले.