जळगाव लाईव्ह न्यूज । समर्पण संस्था संचलित पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन शाळा आणि भारत विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी किल्ले बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

आपल्या महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचा अमूल्य वारसा लाभलेला आहे. किल्ले हे शौर्याचे व धैर्याचे प्रतीक मानले जातात. दिवाळीत किल्ला बांधणे हे एक सकारात्मकतेचे बीज रुजविण्याचे प्रतीक मानले जाते. नवीन पिढीला, विशेषतः विद्यार्थ्यांना, या सर्व गोष्टींची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.
या अनुषंगाने, श्रीमती एस. एल .चौधरी इंग्लिश मीडियम शाळेतर्फे दरवर्षी किल्ला बनवण्याची स्पर्धा घेण्यात येते. यावर्षीही, शुक्रवार, दिनांक १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता शाळेच्या प्रांगणात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

ही स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात येणार आहे:
प्रथम गट: इयत्ता ५ वी ते ८ वी
दुसरा गट: इयत्ता ९ वी ते १२ वी
तिसरा गट: खुला गट
या स्पर्धेमध्ये विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. तरी या पर्यावरणपूरक आणि सांस्कृतिक अशा स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.








