जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२१ । शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन खंडित करण्यात येऊ नये व खंडित करण्यात आलेले वीज कनेक्शन पूर्ववत करण्यात यावे, अशा सूचना ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिल्या. शेतकऱ्यांना वीजेसंदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत चाळीसगाव तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर हे आदेश देण्यात आले.
अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमूळे चाळीसगाव तालुक्यातील शेतकरी बेजार झाले आहेत. दिवाळीसारखा सण जवळ आलेला असतांना शेतातील उत्पन्न काढून बाजारात नेऊन त्याचे मोल हातात येईपर्यंत १५ ते २० दिवसांचा कालावधी लागणार आहे. तसेच शासनाची मदत येत्या काही दिवसात हाती येईल, त्यांनतर शासन आदेश देईल. तोपर्यंत विजबिलाचे हप्ते करून भरण्यासंदर्भात १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी संपर्क साधून केली होती. दरम्यान, महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीची दाखल घेत या काळात कुठलीही वीज कनेक्शन खंडित करण्यात येऊ नये व खंडित करण्यात आलेले वीज कनेक्शन पूर्ववत करण्यात यावे, अशा सूचना ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयातून संबंधित आधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
याप्रसंगी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, जि.प. गटनेते शशिभाऊ साळुंखे, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, शिवसेना जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्राप्रमुख ईश्वर ठाकरे, कास्ट्राईब संघटनेचे सरचिटणीस श्री.पारवे, राष्ट्रवादी शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, रवींद्र सोनूसिंग पाटील, राजू जाट, युवक तालुकाध्यक्ष मोहित भोसले, युवक शहराध्यक्ष शुभम पवार, जयदीप पाटील आदी उपस्थित होते.