जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ । एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, यामागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. कर्मचार्यांनी कामावर परतावे, यासाठी महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या आठवड्यात १४ जणांना निलंबनाची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा १३ कर्मचार्यांच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, यामागणीसाठी राज्यभरात संप पुकारण्यात आला आहे. या संपात भुसावळ आगारातील २८८ कर्मचारी सहभागी झाले आहेत. सरकार आणि कर्मचार्यांमधील चर्चा यशस्वी न झाल्याने हा संप सुरूच आहे. दुसरीकडे कर्मचार्यांनी कामावर परतावे यासाठी सरकारकडून वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, कर्मचारी प्रतिसाद देत नसल्याने एस.टी. प्रशासनाकडून निलंबनाची कारवाई केली जात आहे.

गेल्या आठवड्यात भुसावळातील १४ कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर सोमवारी पुन्हा १३ जणांच्या नोटीस निघाल्या आहेत. या नोटीस मंगळवारी संबंधित कर्मचार्यांना बजावण्यात आल्या.











