जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२१ । पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. परंतु प्रशासकीय मंडळ नियुक्त झाल्यापासून शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय या बाजार समितीमध्ये घेण्यात आलेला नाही, असा आरोप प्रशासक अनिल महाजन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
पाचोरा बाजार समितीवर आधीच पाच कोटीचे कर्ज असताना पाचोरा बाजार समितीमध्ये अनेक चुकीचे निर्णय घेतले जात आहेत. बाजार समिती अजून आर्थिक अडचणीत येईल असे अनेक निर्णय घेतले जात आहे. जास्तीचा जमा खर्च बाजार समितीमध्ये टाकला जात आहे. वेळोवेळी प्रत्येक सभेत अधिकृत हरकत घेऊन सुद्धा बहुमताच्या जोरावर अनेक विषय रेटून पास केले जात आहे. आम्ही अनेक विषयावर घेतलेली हरकत सुद्धा प्रोसिडिंगमध्ये लिहिली जात नाही, सचिव बाळासाहेब बोरुडे हे मिटींग प्रोसिंडिंगवर हरकत नोंदवून घेत नाही आणि सभेनंतर लेखी हरकत दिल्यानंतर सुद्धा तक्रारीची दखल घेत नाहीत उलट सभेनंतर दिलेल्या लेखी हरकत अर्ज निकाली काढले जातात, असा आरोपही प्रशासक अनिल महाजन यांनी केला आहे.
पाचोरा बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. परंतु प्रशासकीय मंडळ नियुक्त झाल्यापासून शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय ह्या बाजार समितीमध्ये घेण्यात आलेला नाही. फक्त जास्तीत जमाखर्च टाकला गेला आहे. अनेक दुरुस्तीची कामे केली गेली, बाजार समितीवर आर्थिक ताण पडेल असे निर्णय घेण्यात आले आहे. त्यामुळे दि.२२ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सभेस मी प्रशासक म्हणून सभेस गैरहजर राहून सभेचा त्याग करत आहे, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.