जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२५ । विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेलेल्या न्हावी (ता. यावल) येथील १८ वर्षीय तरुणाचा चंद्रभागेच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. दर्पण निलेश कोलते (वय १८) असं मयत तरुणाचे असून या घटनेनं न्हावी गावात शोककळा पसरली असून, शोकाकुल वातावरणात आज दर्पणवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

न्हावी येथील मोलमजुरी करणारे कोलते कुटुंबीयांचा मुलगा दर्पण कोलते हा छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट पॉलीटेक्निकल कॉलेजमध्ये द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होता. दरम्यान तीन दिवसांची सुट्टी मिळाल्याने दर्पण हा आपल्या तीन मित्रांसह आणि इतर ठिकाणच्या दोन अशा एकूण पाच मित्रांसोबत संभाजीनगर येथून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेला होता.
पंढरपूर येथे पोहोचल्यावर दर्पण कोलते हा त्याच्या दोन मित्रांसोबत चंद्रभागेच्या पात्रात भक्त पुंडलिकाच्या मंदिराजवळ अंघोळीसाठी उतरले. नदीच्या पात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने दर्पणचा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडाला. त्याच्यासोबत असलेला दुसराही बुडत होता, मात्र नदीकाठी बसलेल्या त्याच्या मित्राने आरडाओरड केल्याने भाविक जमा झाले आणि त्यांनी तात्काळ मनोजला वाचवले. परंतु दर्पण पाण्यात बुडाल्याने सुमारे आठ तासांनंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
आज, सोमवार सकाळी आठ वाजता दर्पणचा मृतदेह न्हावी गावात आणण्यात आला आणि शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दर्पण कोलते हा गरीब कुटुंबातील विद्यार्थी होता. त्याचे आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते आणि आपल्या दोन मुलांचे शिक्षण सांभाळत होते.