⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

जळगाव जिल्ह्यासाठी पुढील काही तास महत्वाचे

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्ह्याला पुढील तीन ते चार तास अति महत्वाचे आहे. कारण हवामान खात्याकडून विजांच्या कडकडाटासह जळगाव जिल्ह्यात  पुढील काही तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात गुलाब चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यात जळगाव जिल्ह्यात देखील धुवांधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळं नदी- नाले दुधडी भरुन वाहत आहेत. तर, जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे वाघूर धरण, गिरणा धरणासह जिल्ह्यातील अन्य धरणदेखील पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याना नागरिकांना थोडा दिलासा मिळाला होता. मात्र, आज पहाटे जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली आहे. पहाटे तीन- चारच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे काही ठिकाणी रस्ते जलमय तर शेतांमध्ये पाणी साचलेले दिसून आले.

आता जिल्ह्यासाठी पुढील तीन ते चार तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, दसरा-दिवाळी सणासुदीच्या तोंडावर अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती व उभ्या पिकांचे तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळं ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.