जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२५ । भुसावळ आणि जळगावकरांचा मुंबई प्रवास आता सुफरफास्ट होणार आहे. कारण लवकरच नागपूर ते मुंबई या दोन शहरादरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. या मार्गावर ट्रेनची संख्या आणि प्रवाशांची वाढती गर्दी पाहून रेल्वेकडून वंदे भारत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो. विशेष या गाडीला जळगाव आणि भुसावळला थांबा असणार आहे. अद्यापही याबाबत रेल्वेकडून घोषणा झाली नसली तरी लवकरच या मार्गावर वंदे भारत सुरु होण्याची शक्यता आहे.

भारतामध्ये सध्या १३६ वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावत आहेत. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमुळे प्रवास वेगवान आणि आरामदायी होत असून प्रवाशांकडून या ट्रेनला प्रतिसादही मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. जळगावकरांनाही वंदे भारत एक्स्प्रेसची प्रतीक्षा असून अशातच लवकरच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते नागपूर यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे.
८३७ किमीचा नागपूर-मुंबई प्रवास वंदे भारत एक्सप्रेस फक्त ९ तासांत पूर्ण करणार आहे. म्हणजेच, प्रवासाचा वेळ पाच ते सहा तास वाचणार आहे. इतर रेल्वेंना मुंबई ते नागपूर या प्रवासासाठी १४ ते २० तास लागतात. तर भुसावळ आणि जळगावहुन मनमाड नाशिक मार्गे मुंबईसाठी सात ते आठ तास लागतात. परंतु वंदे भारत एक्सप्रेसमुळे ३ ते ४ तासांचा वेळ वाचणार आहे. त्याशिवाय आरामदायी प्रवास करता येणार आहे.
नागपूर ते मुंबई यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल. १६० किमी प्रतितास वेगाने धावणारी वंदे भारत सीएसएमटी ते नागपूर या प्रवासादरम्यान ८ स्थानकावर थांबेल. यामध्ये वर्धा, भंडारा, अकोला, भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, कल्याण आणि दादर या स्थानकावर वंदे भारत थांबणार आहे. काही दिवसांतच नागपूर ते मुंबई या रेल्वे मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेनही धावण्याची शक्यता आहे.
मुंबई ते नागपूर यादरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला ८ बोगी असतील. यामध्ये एक बोगी Executive AC असेल तर सात बोगी या एसी Chair Car असतील. यामार्गावर प्रवासाला ९ ते १० तास लागतील. मुंबई ते नागपूर यादरम्यान AC Chair Car चे तिकिट अंदाजे १५०० ते २००० रूपये इतके असेल. तर Executive AC बोगीचे तिकिट २५०० ते ३५०० रूपये इतके आहे. तिकिटाच्या किंमतीबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.