⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

खान्देशातील प्रवाशांसाठी खुशखबर… मुंबई-दोंडाईचा एक्सप्रेस आता भुसावळपर्यंत धावणार, अशी सुटेल गाडी?

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२३ । खान्देशातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे मुंबई सेंट्रल ते दोंडाईचा एक्सप्रेस आता भुसावळपर्यंत धावणार आहे. यामुळे प्रवाशांना लाभ होणार आहे.

खासदार उन्मेश पाटील यांनी मुंबई सेंट्रल दोंडाईचा (09051/52) ही गाडी पाळधी किंवा जळगावपर्यंत करण्यात यावी यासाठी निवेदन दिले होते. यासंदर्भात खासदार उन्मेश पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व दर्शना जर्दोश ,रेल्वे बोर्ड यांच्याशी संपर्क व पत्रव्यवहार व वार्तालाप केला होता.त्या अनुषंगाने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई सेंट्रल दोंडाईचा एक्सप्रेस भुसावळपर्यंत सुरू करण्याचे आदेश दिले आहे.

नविन हंगामी प्रवाशी रेल्वे दि.९ जानेवारी पासुन ३१ मार्च पावेतो प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत असुन सदर गाडी रविवार ,मंगळवार व शुक्रवार रोजी रात्री ११.५५ मिनीटांनी मुंबई सेंट्रल येथुन सुटेल प्रवासादरम्यान बोरीवली भोईसर वापी बलसाड नवसारी चलथान बेस्तान बिने बारडोली व्यारा नवापुर नंदुरबार इ ठिकाणी थांबुनअमळनेर १०.४७ मि.धरणगांव ११.१० मि.पाळधी ११.५५ मि.जळगाव व दुपारी १२ वा.भुसावळ येथे पोहोचेल. दोडांईचाहुन सोमवार बुधवार व शनीवारी सायं ५.४० मि.भुसावळ येथुन सुटेल ६.२५ मि.जळगांव ६.४५ पाळधी ६.५८ मि.धरणगांव ७.१८ मि.अमळनेर ७.४४ मि. येथुन सुटेल.

त्यामुळे संपूर्ण खान्देशातील प्रवाशांना याचा लाभ घेता येणार आहे. याबाबतची माहिती खासदार उन्मेषदादा पाटील यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे.