जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२१ । जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2020 अंतर्गत उडीद, मूग सोयाबीन, मका, तीळ, बाजरी, ज्वारी, भुईमूग, कापूस, इत्यादी पिकांचा विमा रक्कम मंजूर झालेले असून याबाबत शेतकऱ्यांकडून माहिती घेतली असता आजतागायत विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झालेली नसल्याने शेतकर्यांवर हा एक प्रकारे अन्याय आहे.
एकीकडे अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके पूर्णपणे वाया गेली आहेत सध्याच्या परिस्थितीत बळीराजाला आर्थिक मदतीची गरज असून त्याच्या हक्काची नुकसान भरपाई रक्कम तातडीने देण्यात यावी अन्यथा येत्या 2 ऑक्टोंबर रोजी संबंधित पात्र शेतकऱ्यांसोबत उपोषण करावे लागेल असा इशारा खासदार उन्मेष पाटील यांनी दिला आहे.
गेल्या वर्षी नुकसानग्रस्त जळगाव जिल्ह्यातील 10140 शेतकऱ्यांना रक्कम रु.4,70,64,280 मंजूर झालेली असून संबंधित विमा कंपनीमार्फत आजतागायत शेतकऱ्यांना विम्याची रक्कम वितरित केली नसल्याचे कळाले आहे. खरीप हंगाम 2021 आता संपुष्टात येत असून सन 2020 ची खरीप पिकाची विमा रक्कम आजतागायत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न होणे हे अतिशय खेदजनक व निंदनीय आहे.
या संदर्भातील शासन निर्णयान्वये जिल्हा स्तरावरील तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष या नात्याने आपण तात्काळ संबंधित विमा कंपनीस दिनांक 27 सप्टेंबर 2021 पर्यंत पात्र विमाधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याची रक्कम 12% विलंब शुक्लासह जमा करण्याचे आदेश द्यावेत. सदरील विम्याची रक्कम या कालावधीत वर्ग न झाल्यास मी संबंधित विमाधारक शेतकऱ्यांच्या समवेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून म्हणजेच दिनांक 2 ऑक्टोंबर पासून आपल्या कार्यालयासमोर उपोषणाला बसेल. असा इशारा खासदार उन्मेष पाटील यांनी दिला.