⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

मोदीजीं आपसे बैर नही, जलगांव के खासदार तेरी खैर नही; खासदार उन्मेष पाटील सोशल मीडियावर ट्रोल

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२३ । चाळीसगाव, भडगाव व पाचोरा येथून जळगाव येथे दररोज प्रवास करणारे विद्यार्थी, चाकरमने व प्रवाशांच्या सोयीची शटल रेल्वे सेवा म्हणजेच देवळाली भुसावल पॅसेंजर कोरोना काळात तब्बल दोन वर्ष बंद होती. त्यानंतर त्या गाडीचे एक्सप्रेसमध्ये रुपांतर करुन ही गाडी पुन्हा सुरु करण्यात आली मात्र त्याची वेळ बदलल्याने ती गाडी पुर्ववत सुरु होवूनही त्याचा फायदा होत नाही. यामुळे या गाडीची वेळ पुर्वीप्रमाणे करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. या बाबत जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे दर महिन्याला खोटी घोषणा करत सवंग लोकप्रियता मिळवतात. मात्र आता याबाबत प्रवाशांमध्ये संतापाचा उद्रेक झाला असून सोशल मीडियावर हा विषय चांगलाच तापला आहे.

सोशल मीडियावर एक मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. यात एका अनामिक प्रवाशांने (अपडाऊनर) थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहिले असून ‘मोदीजीं आपसे बैर नही, जलगांव के खासदार तेरी खैर नही’ असा धमकीवजा इशारा दिला आहे. जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी गत पाच वर्षात जिल्हात एकही रोजगार निर्माण केला नाही. त्यांच्या मतदार संघातील किमान ८ ते १० हजार तरुण नोकरीसाठी दररोज जळगाव येथे ये-जा करतात. मात्र आता त्यातही अडचणी येत आहे. याचे कारण म्हणजे देवळाली-भुसावळ शटल (एक्सप्रेस)ची वेळ!

ऑगस्ट महिन्यात खासदार उन्मेष पाटील (MP Unmesh Patil) यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा येथील भाजपा अध्यक्ष अमोल शिंदे (Amol Shinde) यांच्यासह पाचोरा रेल्वे स्टेशन सल्लागार समितीच्या शिष्टमंडळाने रेल्वे राज्यमंत्री नामदार रावसाहेब दानवे व रेल्वे बोर्डाचे चेअरमन अनिल कुमार लाहोटी यांची नुकतीच दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी देवळाली भुसावळ शटल लवकरच पूर्व निर्धारित वेळेनुसार धावेल असे आश्वासन मंत्री दानवे पाटील, चेअरमन लाहोटी यांनी भेटीदरम्यान दोन्ही मान्यवरांनी शिष्टमंडळाला दिले होते. मात्र दोन महिने उलटले तरी अद्यापही गाडीची वेळ पुर्ववत झाली नाही. यामुळे जिल्ह्यातील तरुण व विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून भाजपा व खासदार उन्मेष पाटील यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारे पत्र, जसेच्या तसे….

मोदीजीं आपसे बैर नही, जलगांव के खासदार तेरी खैर नही

प्रिय मोदीजी आपणांस हे पत्र मिळावे व आपणांस मैदानावरील खरी परिस्थिती कळावी यासाठी हा पत्रप्रपंच
मोदीजी आपल्या भाषणातूंन आपण तरूणांसाठी विविध प्रकारच्या रोजगाराच्या योजनांविषयी बोलत असतात पण आपल्या जळगाव लोकसभा मतदारसंघात एखादा नविन प्रकल्प आज पर्यंत आलाच नाहीये व आमच्या सारखी सामान्य जनता जी आपल्या पोटापाण्यासाठी चाळीसगाव – भडगांव-पाचोरा येथून रोजगारासाठी जळगाव या जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्या वर्षानुवर्षे अपडाऊन करत होती त्यांनी आता जगावे कसे हा प्रश्न निर्माण झालाय..

महोदय, आपल्या खासदार साहेबांना मेमू गाडीची वेळ पुर्वीच्या वेळेप्रमाणे किंवा अजंठा एक्स्प्रेस भुसावळ पर्यंत करण्याबाबत अनेकदा निवेदन देण्यात आलेले आहेत पण मोदी हे तो मुमकीन है या घोषणेतच सर्व प्रश्न विसरले जात आहेत मोदीजी आम्हाला जर रोज २०० रूपये पदरमोड व जिव धोक्यात घालून जावे लागत असेल तर आम्हाला जर वेगळा विचार येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला जळगाव मतदारसंघात करावा लागला तर त्याबद्दल क्षमस्व.

आपलाच एक त्रस्त

अपडाऊनर

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व खासदार उन्मेष पाटील याच्या भेटीसंदर्भात प्रसिध्द झालेले वृत्त वाचा…