जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील मंत्र्यांसह नेत्यांची कर्जमाफीवरून शेतकऱ्यांवर बेताल वक्तव्ये करण्याची मालिकाच सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच शेतकरी कर्जमाफीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘सारखचं फुकटं कसं मिळेल?’ असे विधान केले होते. त्यावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली. त्यानंतर आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफी बाबत वादग्रस्त विधान केले आहे.

आधी कर्जबाजारी व्हायचं आणि नंतर पुन्हा कर्जमाफी मागायची, हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे वादग्रस्त विधान राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला असून यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पंढपूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी झालेल्या सभेमध्ये विखे पाटील यांनी कर्जमाफीच्या मुद्यावर भाष्य केलं. सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्ज माफ करून घ्यायचं, आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची, हे अनेक वर्ष काम चालू असल्याचे विखे पाटील यांनी म्हटलं आहे. विखे पाटील यांच्यावर शेतकरी नेत्यांसह सोशल मीडियातून सडकून टीकेचा प्रहार झाल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या विधानावरून सारवासारव केली आहे.












