जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२५ । अमळनेर येथे अमळनेर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या भव्य अद्यावत इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली. विशेष यावेळी त्यांनी राजकीय पुढाऱ्यांना बँका कर्ज का देत नाही? याबाबतही भाष्य केलं आहे.

ते म्हणाले, बँका, को-ऑपरेटिव्ह सोसायटी या पुढाऱ्यांना कधीच कर्ज देत नाही. कारण सर्वात जास्त कर्ज बुडवणारी जात ही आपलीच असते, असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं. जिल्हा मध्यवर्ती बँकांप्रमाणेच शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी आता राष्ट्रीयकृत बँका सुद्धा मैदानात उतरल्या आहेत. सुरुवातीला राष्ट्रीयकृत बँका कर्ज देताना गुलाबराव पाटील यांच्या कपड्यांकडे बघून कर्ज देत होत्या. मात्र, आता शेतकरी आणि बचत गटांना सुद्धा या बँका कर्ज द्यायला लागल्या आहेत.
ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, मी माझ्या आयुष्यात को-ऑपरेटिव्ह संस्था काढल्या नाहीत. मी कुठलाही विकास सोसायटीचा संचालक सुद्धा नव्हतो. मात्र, अनिल पाटील आणि संजय पवार यांनी मला जबरदस्तीने फेडरेशनचे संचालक केले.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी सहकारातील राजकारणाविषयी भाषणातही जोरदार फटकेबाजी केली. सोसायटी आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणूक सोपी आहे. कारण यांना मर्यादित मतांमध्ये कार्यक्रम करायचा आहे. सोसायटीमध्ये निवडून येणे मोठे अवघड आहे. या ठिकाणी पिढी जात राजकारण सुरु असते, असं ते म्हणाले.