जळगाव परिमंडलात ‘इतक्या’ लाख ग्राहकांनी बसवले स्मार्ट वीजमीटर

फेब्रुवारी 11, 2026 4:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महावितरणने राज्यातील सर्व वीज ग्राहकांसाठी ‘स्मार्ट टीओडी (टाइम ऑफ डे)’ वीजमीटर आणले असून, यामुळे ग्राहकांना केवळ अचूक बिलच मिळणार नाही, तर चक्क वीजदरात सवलत मिळवण्याची सुवर्णसंधीही उपलब्ध झाली आहे. जळगाव परिमंडलात आतापर्यंत साडेचार लाख ग्राहकांकडे स्मार्ट टीओडी वीजमीटर बसवण्यात आले असून, त्यांना अचूक बिलासह सवलतीचा लाभ होत आहे. या उपक्रमाबाबत काही लोकांकडून गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र ग्राहकांनी कोणत्याही अफवेला बळी न पडता स्मार्ट मीटर बसवण्यास सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.

smart meter

महावितरणने यापूर्वीही काळानुसार वीज मीटरमध्ये बदल केले आहेत. यांत्रिक, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, इलेक्ट्रॉनिक मीटरनंतर आता स्मार्ट डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. जुने, सदोष किंवा नादुरुस्त मीटर बदलणे ही नियमित व कायदेशीर प्रक्रिया असून, त्यासाठी ग्राहकांची लेखी परवानगी आवश्यक नाही. ग्राहकांकडे बसवण्यात येणारे स्मार्ट टीओडी मीटर पूर्णतः मोफत असून, त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. यासाठी कोणतेही कर्ज काढलेले नसून केंद्र सरकारच्या अनुदानातून हा प्रकल्प राबवला जात असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

Advertisements

जळगाव परिमंडलात आजपर्यंत 4 लाख 47 हजार 122 ग्राहकांकडे स्मार्ट टीओडी मीटर बसवण्यात आले आहेत. त्यात जळगाव मंडलात 2 लाख 76 हजार 982, धुळे मंडलात 1 लाख4 हजार 266 तर नंदुरबार मंडलात 65 हजार 874 मीटर सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडे बसवण्यात आले आहेत.

Advertisements

दिवसा वापरावर सवलत : स्मार्ट टीओडी मीटर हे डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित आहे. यात दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेनुसार वीज वापर मोजण्याची सुविधा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना प्रति युनिट 80 पैसे ते 1 रुपयापर्यंत सवलत मिळत आहे. 1 जुलै 2025 पासून ही सवलत लागू झाली असून, घरगुती ग्राहकांसाठी अशा प्रकारचे ही पहिले ऐतिहासिक पाऊल महावितरणने उचलले आहे. एखादा घरगुती ग्राहक दरमहा 100 युनिट वीज वापरत असेल, तर जुन्या दरानुसार त्याचे बिल साधारणत: 875 रुपये येत होते. नवीन दरकपात आणि स्मार्ट मीटरच्या टीओडी सवलतीमुळे हेच बिल आता फक्त 784 रुपयांपर्यंत खाली येऊ शकते. म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहक थेट आपले पैसे वाचवू शकतात.

सरासरी बिले होणार इतिहासजमा : अचूक रीडिंगमुळे ‘सरासरी’ किंवा ‘अंदाजे’ बिलांचा त्रास संपणार आहे. जेवढी वीज वापरली, तेवढेच बिल येणार. हे मीटर पूर्णपणे पोस्टपेड आहेत. सध्याच्या मासिक पद्धतीप्रमाणेच ग्राहकांना बिल भरायचे आहे. महावितरणच्या खास ‘अ‍ॅप’वर तुम्हाला तासागणिक किती वीज वापरली जात आहे, याची माहिती मिळेल. घर बंद असले तरी मीटर रीडिंग आपोआप मुख्यालयात नोंदवले जाईल.

सौर ऊर्जा ग्राहकांसाठी वरदान : ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’ अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प लावणाऱ्या ग्राहकांसाठी हे मीटर अत्यंत उपयुक्त आहे. हे मीटर नेट-मीटरिंगचे कामही करते, ज्यामुळे तुम्ही ग्रीडला दिलेली अतिरिक्त वीज आणि स्वतः वापरलेली वीज याचा अचूक हिशेब ठेवणे सोपे होईल.

ग्राहकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. स्मार्ट मीटर हे पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि वीजबिलात सवलत देण्यासाठीच आणले आहेत. तंत्रज्ञानाचा स्वीकार करा आणि आपले वीजबिल कमी करा, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now