जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२१ । यावल तालुक्यातील अट्रावल येथील मित्राच्या मुलीच्या लग्न सोहळ्यासाठी जाणाऱ्या मित्रावर काळाने झडप घातली. समोरुन येणाऱ्या भरधाव वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर सोबतचा एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज बुधवारी ममुराबाद– विदगाव या रस्त्यावर घडली. सागर मोरे असे या अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव असून गोविदा तुकाराम सोनवणे असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. दरम्यान, जखमी झाला असून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत असे की, अट्रावल येथे असलेल्या लग्न सोहळ्यासाठी सागर मोरे व त्याचा मित्र गोविदा तुकाराम सोनवणे हे दुचाकीने निघाले होते. सागर व गोविंदा हे जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय रेशन गोदामात हमालीचे काम करतात. त्यांच्या सोबतच असलेले सहकारी युवराज बोरसे यांच्या मुलीचे आज (ता.२८) यावल तालुक्यातील अट्रावल येथे लग्न होते. या लग्नासाठी सागर व गोविंदा असे दोघेही (एमएच १९ बीपी ७४१३) दुचाकीने अट्रावलकडे जाण्यासाठी निघाले होते.

याच दरम्यान विदगावकडून सुसाट वेगाने येणारी माल वाहु वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सागर मोरे जागीच ठार झाला. तर गोविंदा गंभीर जखमी झाला. अपघातानंतर मालवाहू वाहनांवरील चालक पसार झाला होता.
सागरचे वडील महापालिकेत कार्यरत असून घरून कामावर जातो असे सांगून नेहमीप्रमाणे गोविंदासेाबत गावातून (ममुराबाद) येथून निघाला. मात्र अकराच्या सुमारास त्याच्या मृत्युची बातमी कुटूंबीयांना कळाल्यावर ग्रामस्थांसह नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. सागरचा मृतदेह पाहताच कुटूंबीयांनी एकच आक्रोश केला. सागर याच्या पश्चात आई सिंधु, वडील राधेशाम, पत्नी पूजा मुलगा राघव (वय ७) मुलगी उज्ज्वला (वय ४) असा परिवार आहे.








