जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२५ । राज्यातील सर्वसामान्यांना झटका देणारी बातमी आहे. ती म्हणजेच वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीने घरगुती ग्राहकांची वीज प्रति युनिट ६० पैशांनी महाग केली. यासाठी इंधन समायोजन शुल्क (एफएसी) चा आधार घेण्यात आला. महावितरणच्या दर वाढीमुळे सर्वसामान्यांना वीज दरवाढीचा शॉक बसला आहे.

एकीकडे राज्यात १ एप्रिलपासून वीज स्वस्त होणार होती. मात्र, महावितरणने स्वस्त विजेला आक्षेप घेतल्याने महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाने याबाबतचा निर्णय स्थगित ठेवला. या स्थगितीमुळे राज्यातील महावितरणच्या ग्राहकांना पुढील आदेशापर्यंत सध्या सुरू असलेल्या दरानेच वीज बिल हाती येणार आहे. त्याच दरम्यान महावितरणने परिपत्रक काढून घरगुती ग्राहकांची वीज महाग केली. कंपनीचे स्पष्ट म्हणणे आहे की, हा एफएसी मार्चच्या वापरावरच लागू केला जाईल. मात्र, महावितरणचे वीज खरेदीचे महागडे दर पाहता ही वसुली येत्या काही महिन्यांतही सुरूच राहणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
वर्गवारीनुसार इतके पैसे मोजावे लागणार?
वर्गवारीनुसार, व्यावसायिक ग्राहकांना ४० ते ६० पैसे, कृषी १५ ते ३० पैसे, पथदिवे ३० ते ३५ पैसे, पाणीपुरवठा योजना ३० ते ३५ पैसे, ईव्ही चार्जिंग स्टेशनला ४० पैसे आणि उद्योगांना ३५ ते ४० पैसे अधिक द्यावे लागतील.
दरम्यान महाराष्ट्रातील विजेची मागणी ३० हजार मेगावॅटच्या जवळ पोहोचली. राज्यात ७ एप्रिलला सर्वाधिक मागणी २९,४११ मेगावॅट होती. यामध्ये मुंबईच्या ३७५३ मेगावॅटचाही समावेश आहे. दुसरीकडे, राज्यात खासगी कारखान्यांसह उत्पादन १८,५०३३ मेगावॅट होते. उर्वरित मागणी केंद्रीय कोटा आणि पॉवर एक्स्चेंजद्वारे पूर्ण करण्यात आली. चंद्रपूर, खापरखेडा आणि भुसावळमधील प्रत्येकी एक युनिट बंद आहे. अशा स्थितीत महावितरणला महागडी वीज खरेदी करावी लागणार आहे.