जळगाव लाईव्ह न्यूज । महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद जळगावात उघडपणे समोर आले. महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यातील जागावाटपाबाबतची बैठक फिस्कटली.

जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर एकमत न झाल्याने बैठक अर्धवट सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बाहेर पडत थेट स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत “डोक्यात हवा गेली आहे” अशी टीका केली.

तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर जागावाटपात अतिरेक केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांनी काँग्रेस आणि मनसेसोबत स्वतंत्रपणे चर्चा सुरू असल्याचेही जाहीर केले आहे. निवडणुकीच्या तोंडावरच महाविकास आघाडीतील दोन प्रमुख घटक एकमेकांवर आरोप करत असल्याने आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट चित्र सध्या दिसत आहे. विशेष म्हणजे दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चेची दारे बंद झाल्याचेही जाहीर केल्याने राजकीय वातावरण तापले आहे,







