जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२५ । मागच्या काही दिवसापासून उन्हाने होरपळून निघत असलेल्या राज्यातील जनतेला उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. कारण राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे हवामान खात्याकडून जळगावसह अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून त्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

या जिल्ह्यांना अलर्ट
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात अंशतः ढगाळ वातावरणासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी आज वादळी वाऱ्यांसह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यंदा मार्च, एप्रिल हे दोन महिने जळगावकरांना प्रचंड उष्णतेचे गेले. मागच्या काही दिवपासून जळगावात तापमानाचा पारा वाढला असून वाढत्या उष्णतेमुळे जळगावकर होरपळला आहे. दरम्यान शुक्रवार ४३.९ अंशावर असलेले जळगावचे तापमान घसरून शनिवारी ४२.८ अंशावर आले. आजपासून आगामी काही दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज आहे.