⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

Maharashtra Politics : महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तारासाठी गुजरात पॅटर्न? अनेकांचा पत्ता होणार गुल!

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२२ । राज्यात महाविकास आघाडीची सत्ता जाऊन भाजप, एकनाथ शिंदे गटाची सत्ता स्थापन झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला जवळपास एक महिना पूर्ण होत आला असून लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे आमदार अपात्रतेसह इतर विविध याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल असल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबत असल्याचे म्हटले जात असताना आता दुसराच विषय समोर येत आहे. राज्यात मंत्रिमंडळ विस्तार करताना गुजरात पॅटर्नचा उपयोग केला जाणार असल्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. राज्यात गुजरात पॅटर्नचा उपयोग केल्यास अनेक दिग्गजांचा पत्ता गुल होऊ शकतो.

राज्यातील शिवसेनेचा सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहचला आहे. बुधवारी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) कामकाज झाले असता शिंदे गट आणि शिवसेनेत सुरु असलेला सत्तासंघर्ष मोठ्या खंडपीठ किंवा घटनापीठाकडे सोपवला जाण्याचे संकेत सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. शिवसेना आणि शिंदे गटाच्या वतीने सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या असून त्यावर आज सुनावणी पार पडली. दोन्ही पक्षाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी होईल असे न्यायालयाने सांगितले. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एनव्ही रमना, जस्टिस कृष्ण मुरारी आणि हिमा कोहली यांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी पार पडली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या याचिकेवर दि.२० जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात कामकाज झाले असता पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोर्टाने जैसे थे परिस्थिती सांगितली आहे. त्याचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीच संबंध नाही. न्यायालयीन प्रक्रिया आणि मंत्रिमंडळ विस्तार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार केला जाईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच कोर्टाचा निकाल यायचा होता म्हणून आमचा मंत्रिमंडळ विस्तार थांबला नाही. पुढील काही दिवसात विस्तार निश्चित होईल, असा दावाही त्यांनी केला आहे.
हे देखील वाचा : उद्धव ठाकरेंची फडणवीसांना खुली ऑफर : तुम्ही शिंदेंना सोडा, मी सगळी शिवसेना घेऊन भाजपसोबत येतो

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दि.९ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा झाली होती. या भेटी राज्यातील मंत्री मंडळ विस्ताराबाबत आणि शिंदे गटातील अपक्ष आमदारांना आणि ठाकरे सरकारमधील सर्व मंत्र्यांना मंत्रिपदे देण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचं सांगितलं जात होते. या बैठकीत मंत्रिमंडळातील एकूण 43 मंत्र्यांपैकी शिंदे गटाने 10 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्रिपदांची मागणी केल्याची केली आहे. तर भाजपला 28 मंत्रिपदे देण्याचं या बैठकीत ठरल्याचं सांगण्यात आले. तसेच शिंदे गटाला कोणती खाती द्यायची यावरही चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. गृहखातं फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याची चर्चा आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं वृत्त असले तरी त्याला अद्याप भाजपमधून कोणीही दुजोरा दिलेला नाही.

अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजप, शिंदे सरकारला चिमटा काढत चांगलीच फटकेबाजी केली होती. भाजपचे आणि शिवसेनेचे अनेक आमदार असून अनेकांना मंत्रिमंडळात स्थान अपेक्षित आहे. परंतु कुणाचा नंबर लागणार हे सांगता येत नाही. चंद्रकांत दादा तुम्ही बाक वाजवू नका, तुम्हाला मंत्रिपद मिळेल कि नाही हे सांगता येत नाही. गिरीश तर अजून पण रडतोय असा टोमणा त्यांनी लगावला होता. नुकतेच पार पडलेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना, सध्या आपल्याला अडीच वर्ष स्थिर सरकार देत पुढे मोठा पक्ष म्हणून समोर जायचं आहे. भाजप आणि शिवसेनेतील सर्वांचा विचार करायचा असून सर्वांच्याच अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात गुजरात पॅटर्न मंत्रिमंडळ विस्तारासाठी वापरला जाणार असल्याची शक्यता आहे. गुजरात, मध्यप्रदेश आणि इतर काही राज्यात मंत्रिमंडळ विस्तार करताना जसा पॅटर्न लागू करण्यात आला होता तसे जर केले तर अनेकांचा पत्ता गुल होईल. भाजपची हि रणनीती हिट ठरली असून नवीन चेहऱ्यांना संधी मिळत असल्याने इतर पदाधिकारी, कार्यकर्ते जोडले जात आहे. आगामी निवडणूक आणि पक्षीय बलाबल लक्षात घेत सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी शक्यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.