जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२५ । खरीप हंगामाच्या अनुषंगाने कृषी विभागाने अनियमिततेसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील सात कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामातील बी-बियाण्यांची मागणी लक्षात घेता कृषी विभागाकडून पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. जास्तीच्या भावाने बियाणे विक्रीसह खताची लिंकिंग करणाऱ्यांवर कृषी विभागाकडून कारवाई केली जात आहे. शेतकरी पेरणीच्या अनुषंगाने मान्सूनपूर्व बियाणे व खताची खरेदी करून ठेवत असतो. मात्र, सध्या जिल्ह्यात काही दुकादारांकडून शासन नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पथकाच्या लक्षात आल्याने जिल्ह्यातील अशा सात कृषी विक्रेत्यांवर कारवाई करीत त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. बनावट खते व बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणुकीचे प्रकार होतात.
या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी कृषी विभागाकडून भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची बियाणे व खते घेताना फसवणूक होऊ नये व जास्तीच्या दराने विक्री होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना तक्रार करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. यंदाही चोपडा तालुक्यात कापसाचे बनावट बियाणे आढळून आल्याने कारवाई करण्यात आली आहे. सध्या जिल्हाभरात भरारी पथकांमार्फत तक्रारीनंतर कृषी केंद्राची तपासणी केली जात आहे.
कृषी विभागाकडे तक्रार करा
शेतकऱ्यांनी बी-बियाणे खरेदी करताना पक्के बिल कृषी केंद्र चालकाकडून घ्यावे. त्याचप्रमाणे निर्धारित केलेल्या बियाण्याच्या किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करीत असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी केले आहे.