जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२६ । राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने दिलेली मुदतवाढ आज, ३० एप्रिल रोजी संपणार आहे. ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी किंवा अर्जातील त्रुटींची पूर्तता केलेली नाही, अशांना योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आता या योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेसाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत

जळगाव जिल्ह्यातील स्थिती
जळगाव जिल्ह्यातून एकूण ५ लाख ३४ हजार ७१३ लाभार्थ्यांनी ‘नारीशक्ती’ ॲपद्वारे या योजनेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी प्रशासकीय तपासणीनंतर ५ लाख ३० हजार ६४१ अर्जांना मान्यता देण्यात आली आहे. मात्र, यातील अनेक लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. तसेच काही अर्जांमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याचे समोर आले आहे. ही दुरुस्ती करण्यासाठी आज रात्रीपर्यंतच वेळ उपलब्ध आहे.

का करण्यात आली ई-केवायसी बंधनकारक?
योजनेचा लाभ केवळ खऱ्या आणि गरजू लाभार्थ्यांनाच मिळावा, तसेच बनावट लाभार्थ्यांना चाप बसावा, यासाठी सरकारने ई-केवायसी अनिवार्य केली आहे. ज्या महिलांची ई-केवायसी पूर्ण नसेल, त्यांना दरमहा मिळणारे १५०० रुपये थांबवले जाऊ शकतात.
मुदतवाढ मिळणार का?
गेल्या काही महिन्यांपासून या योजनेला सातत्याने मुदतवाढ दिली जात होती. मात्र, आता लाभार्थी संख्या निश्चित करण्यासाठी आणि बजेटचे नियोजन करण्यासाठी सरकार ही मुदत पुन्हा वाढवण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील ज्या भगिनींची ई-केवायसी प्रलंबित आहे, त्यांनी तातडीने जवळच्या सेतू केंद्रावर किंवा मोबाईल ॲपद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.










