जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२६ । जून महिन्याचा पंधरवडा उलटूनही पावसाने दडी मारल्याने जळगावकर उन्हाच्या चटक्याने आणि असह्य उकाड्याने त्रस्त झाले होते. मात्र, गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सलग तीन दिवस झालेल्या पावसानंतर गुरुवारी मात्र पावसाने विश्रांती घेतली, तरीही दिवसभर आकाश ढगाळ होते.

या पावसामुळे जळगावच्या तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे, ज्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आगामी चार दिवस जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. दरम्यान जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे रखडलेल्या खरिपाच्या पेरणीला वेग आला आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आगामी चार दिवस जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. काल गुरुवारी ३५ अंश सेल्सिअसपर्यंत होते. १ जुलैपर्यंत तापमानाचा पारा ३४ अंशापर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तापमान आटोक्यात राहणार असल्याने नागरिकांना उन्हाच्या त्रासापासून सुटका मिळणार आहे. मात्र जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली नाही. काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे
आयएमडीने दि. २९ पर्यंत पावसाचा अंदाज वर्तविला नव्हता. मात्र गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर गुरुवारी पहाटेपासून काही तालुक्यात दमदार पाऊस झाला. यानंतर सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते.
शेतशिवारात पेरण्यांना वेग!
पाऊस लांबल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत होते आणि खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र, गेल्या तीन दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे जमिनीला चांगला ओलावा मिळाला आहे. गुरुवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली असली तरी, पहाटेच्या सुमारास जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सुखावलेल्या शेतकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली. त्यामुळे जिल्ह्यात रखडलेल्या खरिपाच्या पेरण्यांना आता चांगलाच वेग आला असून शेतशिवारात लगबग सुरू झाली आहे.उशिरा का होईना, पावसाच्या आगमनाने जळगावकरांचा उकाडा पळाला असून बळीराजाच्या चेहऱ्यावरही आनंद ओसंडून वाहत आहे.







