जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२५ । जळगावसह महाराष्ट्रातील कडाक्याची थंडी ओसरली आहे. तसेच पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्यात ढगाळ वातावरण होत आहे. जळगाव मधील काही दिवसापूर्वी ७ अंशापर्यंत घसरलेला तापमानाचा पारा १४ अंशांच्या वर गेला आहे. कमाल तापमानाचा पारा देखील तिशीपार गेला आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढला असून, उकाडा जाणवू लागला आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी जळगाव शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला होता. किमान तापमान ७ अंशापर्यंत घसरल्याने हुडहुडी भरणारी थंडी जळगावकरांना जाणवत होती. मात्र मागच्या काही दिवसापासून तापमानात वाढ होताना दिसत आहे. यामागचं कारण म्हणजे बंगालच्या खाडीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचे रूपांतर चक्रीवादळात होणार होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार असल्याची चिन्हे आहेत.

राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्यात ढगाळ वातावरण होत आहे. यामुळे थंडी कमी झाली असून तापमानात वाढ झाल्याने दुपारच्या वेळेस उकाडा जाणवत आहे. दरम्यान वातावरणात होणारा बदल पाहता त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. सर्दी, खोकल्यासारख्या आजारांना बदलत्या हवामानाने आमंत्रण दिल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. शिवाय पुढे काही दिवस वातावरण असेच राहणार असल्याचे देखील हवामान खात्याने सांगितले आहे. ऐन हिवाळ्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज?
आज राज्यात थंडी कमी होणार असून, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत ढगाळ आकाश, विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.









