जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२५ । जळगावसह राज्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानामध्ये वाढ होत असून त्यामुळे गारठा कमी होत उकाडा वाढल्याचे दिसून येत आहे. जळगावात एकाच दिवसात किमान तापमानाचा पारा जवळपास ४ अंशांनी वाढला आहे. सोबत कमाल तापमानही मोठी वाढ झालीय. यामुळे जळगावात सध्या थंडी ओसरली आहे. Jalgaon Weather Update

गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यात तापमानात घसरण झाल्याने थंडीचा कडाका वाढला होता. उत्तरेकडून येणाऱ्या थंडी वाऱ्यामुळे किमान तापमान ९ अंशाखाली घसरले होते. मात्र मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ होऊन थंडी गायब झाली आहे.
जळगावमध्ये मंगळवारी तापमानाचा पारा १४.२ अंशांवर गेल्याने थंडी जाणवत होती. मात्र काल बुधवारी (१५ जानेवारी) ढगाळ वातावरणामुळे पारा ४ अंशांनी वाढून किमान तापमान १८.१ अंशांवर गेल्याने थंडी कमी झाल्याचे जाणवले. आता १७ जानेवारीपर्यंत थंडीच्या तीव्रतेमध्ये घट होऊन किमान तापमान १६ ते २० डिग्री सेल्सिअसवर राहणार आहे, अशी माहिती हवामान अभ्यासक यांनी दिली.
राज्यातील स्थिती काय?
सध्या राज्यातील अनेक भागात तापमानात वाढ दिसून आली. राज्यामध्ये सकाळच्या सुमारास गारठा आणि दाट धुके पाहायला मिळत आहे. तर दुपारी कडक ऊन आणि रात्री पुन्हा थंडी असे वातावरण झाले आहे. राज्यात सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे हलक्या पावसाची शक्यता आहे. राज्यात येत्या २४ तासांमध्ये किमान तापमानात २ अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज आकाश ढगाळ राहून विदर्भामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर उर्वरीत महाराष्ट्रामध्ये हवामान कोरडे राहिल. तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.