⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

कुलगुरू साहेब हा अट्टहास कोणासाठी? ऍड.कुणाल पवार यांचा प्रश्न

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२१ । क ब चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव यांचेतर्फे आयोजित २९ वा दिक्षांत समारंभ ऑनलाईन होणार, हे म्हणजे निव्वळ धुळफेक आहे. मुळात या दिक्षांत समारंभाची इतकी घाई असण्याचे कारण काय? महाराष्ट्रातच नव्हे तर देशात कोविड १९ ची इतकी महाप्रलंयकारी लाट नव्हे तर त्सुनामी आलेली असतांना जेव्हा एकीकडे संपूर्ण जगच थिजलंय, थांबलय तर मग आपण हा ऑनलाईनच्या नावाखाली फक्त विद्यार्थ्यांविना हा दिक्षांत समारंभ आयोजित करताय  कोणासाठी?

दिक्षांत समारंभ हा एक गुणगौरव सोहळा असून विविध विद्याशाखेच्या सुवर्णपदक प्राप्त तसेच पीएच डी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना त्यांनी त्यांच्या क्षेत्रात आणखी अतुलनीय असे कार्य करुन देश, तसेच सर्व समाजापयोगी कार्यासाठीचे त्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूनं या सोहळ्याचे आयोजन होणे अपेक्षित असतांना  घडत मात्र वेगळे आहे, कारण यात कोणाही विद्यार्थ्याला प्रत्यक्ष सुवर्णपदक अथवा पदवी देऊन सन्मानित केले जाणार नसून फक्त यासंबंधीची प्रक्रीया पूर्ण केली जाणार आहे. यात विद्यार्थ्यांचे कोणते  हित साधले जाणार?

या सोहळ्यासाठी मा कुलगुरू महोदय नाशिकहून येणार ते शासन निर्णयानुसार १४ दिवस विलगीकरणात राहून मगच कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? तसेच महत्वाचे असे शासकीय कार्यक्रमांनाच शासनाने परवानगी देत असतांना हा विद्यार्थ्यांसाठी असलेला सोहळा विद्यार्थ्यांविना घेण्यात नेमके काय दाखवायचे आहे ?

मा.कुलपती तथा राज्यपाल महोदय तसेच मा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हे दोघेच फक्त ऑनलाईन उपस्थित राहणार असून या कार्यक्रमासाठीचे जे  इतर मान्यवर आहेत, जसे की मा. कुलगुरू, मा.प्र कुलगुरू मा. परिक्षा नियंत्रक, मा. कुलसचिव तसेच चारही विद्याशाखांचे अधिष्ठाता तसेच सुत्रसंचालक आणि हा कार्यक्रम युटयूब वर लाईव्ह करण्यासाठीची तांत्रिक बाजू सांभाळणारा समुह हे तर प्रत्यक्ष विद्यापीठात एकाच ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यापैकी किती लोक कौरौना मधे उपचार घेवून आलेले आहेत ते स्वतः कुलगुरू यानी सांगावे

तसेच इतके सर्व मान्यवर उपस्थित असणार म्हणजेच त्यांच्यासाठी सेवकांचीही उपस्थिती त्याप्रमाणातच ठेवावी लागणार. याचाच अर्थ या ठिकाणी किमान २० जणांची उपस्थिती असणार. तसेच जवळपास दोन ते अडीच तासांचा हा कार्यक्रम असणार. तेव्हा, या सर्वांच्या आरोग्याशी हा एक प्रकारे खेळ नाही का?

विद्यापीठातून अथवा संलग्नित महाविद्यालये,परिसंस्था यांच्यातून शिक्षण घेत पदवी घेऊन रोजगारानिमित्तीने बाहेर पडणाऱ्या कोणाही उमेदवाराकडे कोणताही रोजगार उपलब्ध करुन देणारी संस्था मग ती सरकारी असो की खाजगी कधीही पदवी प्रमाणपत्र मागत नाही. तर ते फक्त आणि फक्त पदवीचे गुणपत्रक आणि उमेदवाराची पात्रता बघूनच नोकरी रोजगार देत असते.

रोजगार शोधणाऱ्या मध्ये ही पात्रता या एका पदवीप्रमाणपत्रामुळेच येणार आहे असेही काही नाही. मग विद्यार्थ्यांच्या हिताआड नेमके काय असे सुरु आहे की विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा असा हा सोहळा विद्यार्थ्यांविना घेण्याची इतकी घाई का? नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ आणि अकोल्याच्या डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठ यांनी जर पदवीप्रदान सोहळा पुढे ढकलला असेल तर कबचौउमविलाच नेमकी कशाची घाई झालीय की हा सोहळा विद्यार्थ्याविना घ्यावा लागतोय.

जळगांव जिल्ह्याचा कोविडच्या पहिल्या लाटेपासूनच खुप प्रचंड संक्रमित जिल्ह्यात समावेश होता. त्यात दुसऱ्या लाटेत तर तो देशात टॉप टेन मध्ये समाविष्ट होता. आता कुठे राज्य शासनाच्या विविध उपायांनी राज्यात थोडाफार दिलासा मिळत आहे. तशीच परिस्थिती जळगांव जिल्ह्याचीदेखील आहे. त्यात विद्यापीठात हा समारंभ आयोजित करुन नेमके कोणाचे हित संबंधित साधू इच्छितात हा मोठा संशोधनाचा विषयच होऊ शकतो.

कबचौउमवित देखील कोविड१९ चा प्रचंड संसर्ग झालेला आहे. त्यात विद्यापीठातील कित्येक अधिकारी,कर्मचारी संसर्गित होऊन रुग्णालयात आजही दाखल आहेत तर काही बरे होऊन घरी आहेत तर काहींचे दुःखद निधनही झालेले आहे. अगदी चार-पाच दिवसांपूर्वीही एका ख्यातनाम कार्यालयीन कर्मचाऱ्याचा जळगाव शहरातच उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू ओढावलेला असतांना, अशा दुर्दैवी परिस्थितीत विद्यापीठ पुन्हा का संसर्गाला आमंत्रण देत आहे. पदभार घेण्याच्या कार्यक्रमात किती लोकाना संसर्ग जाला ते देखील अभ्यास करून विद्यापीठ प्रशासनाने जाहिर करावे असे आव्हान अँड कुणाल पवार भूषण  भ दाणे देवेंद्र मराठे शिवराज पाटील अजिंक्य पाटील गौरव वाणी यानी केले आहे