जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२५ । मागच्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. सध्या मुंबई, कोकण किनारपट्टी, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. आता हवामान विभागाने, राज्यात आज अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून याच पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान आठवड्याच्या खंडानंतर जळगाव जिल्ह्यातही पावसाचा शिडकावा झाला आज जोरदार पावसाचा अंदाज आहे.

जळगाव शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने दडी मारली होती. दुसरीकडे पावसाने पाठ फिरविल्याने तापमानाचा पारा वाढून उकाडा वाढला होता. यामुळे जळगावकर हैराण झाला आहे.सोबतच शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात असून शेतकरी वर्ग जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र काल मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपासून आकाशात ढगांनी गर्दी केल्यांनतर सायंकाळी पावसाचा शिडकावा झाला. आज बुधवारीही हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मंगळवारी ढगाळ वातावरण राहिल्याने तापमानात तीन ते चार अंशांनी घटले.

हवामान विभागाने 23, 24 आणि 26 जुलै रोजी पावसाचा राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला असून 25 जुलै रोजी काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. याशिवाय काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस होण्याचाही अंदाज आहे. जिल्हा प्रशासनाने देखील सावधानतेचा इशारा दिला आहे. या काळात नदी-नाल्यांच्या काठाजवळ न जाण्याचा आणि पावसादरम्यान शेतावर किंवा झाडाखाली न थांबण्याचा इशारा देण्यात आला आहे.








