जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२३ । अजून फेब्रुवारी महिना संपला नसून उष्णतेची लाट जाणवू लागली आहे. राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा हळूहळू वाढू लागला आहे त्यामुळे वाढत्या उष्णतेने हैराण केले आहे. मागच्या काही दिवसांपासून मे-जूनसारखी उष्णता फेब्रुवारीमध्येच जाणवत आहे. त्यातच मार्च महिन्यातच यंदा मे हीटची परिचिती येणार असल्याची शक्यता आहे. येत्या २८ फेब्रुवारीपासून उत्तर महाराष्ट्रात तापमानात वाढ हाेईल. पारा चाळिशीपुढे जाण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रात जळगावमध्ये सतत तापमान वाढत आहे. ढगाळ वातावरणाचा अपवाद वगळता जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंशांपुढे गेलेले आहे. तर किमान तापमान ९ ते १० अंशांवर स्थिर आहे. त्यामुळे दिवसा आणि रात्रीच्या तापमानातील तफावत वाढत असून, त्याचा परिणाम आराेग्यावर हाेताना दिसताे आहे. या वर्षी मार्च महिना सर्वाधिक हाॅट असेल. या महिन्यात तापमान ४२ अंश सेल्सिअसपुढे जाण्याची शक्यता आहे.
गेल्या दाेन दिवसांपासून उन्हाचे बसणारे चटके हे त्याचेच संकेत असल्याचे समाेर येते आहे. विशेष म्हणजे यंदा उन्हाळ्याच्या पंधरा दिवस आधीच उन्हाचे चटके बसू लागले आहेत.सकाळी नऊ वाजेपासूनच शरीराला उन्हाचे चटके जाणवत आहे. दुपारच्या वेळी तर दुचाकीवर फिरताना अक्षरश: आगीच्या लोळामधून दुचाकी जात आहे की काय, अशी अवस्था होत आहे.