जळगाव लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२५ । जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) तापमानात मोठे चढ-उतार सुरू असून फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच थंडी (Cold) गायब होऊन तापमानात (Temperature) वाढ झाल्याने उन्हाचा चटका जळगावकरांना जाणवत आहे. दरम्यान, २०१५ मध्ये फेब्रुवारी महिन्यात कमाल तापमान ३४ अंशांवर होते. यंदा त्यात वाढ होऊन सोमवारी पारा ३५.७ अंशांवर होता. पुढील काही दिवसांत हे तापमान ३७ ते ३९ डिग्री सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. Jalgaon Temperature Today

जिल्ह्यात काही दिवसापूर्वी सकाळी आणि रात्री थंडीचा गारवा काहीसा जाणवत होता. मात्र आता तापमानात वाढ होऊ लागल्याने तोही थंडीचा गारवा गायब झाला आहे. सोमवारी जळगावचे किमान तापमान १४.२ तर कमाल तापमान ३५.७ इतके होते. कमाल तापमानामध्ये सतत वाढ होत असल्याने पहाटे थंडी आणि दुपारी कडक ऊन अशा संमिश्र वातावरणाचा अनुभव सध्या जळगावकर घेत आहेत. फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढला असून मार्च एप्रिल महिन्यात तापमान कसे राहणार? असा प्रश्न जळगावकरांना पडला आहे. जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती आणि जंगलतोडीमुळे तापमानात वाढ होते आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे दिवसा तापमान वाढत जाते; पण रात्री हवा पातळ होऊन किमान तापमान घसरते आहे. त्यामुळे पहाटे तापमानात घट होते आहे. किमान तापमान १४ अंशांवर आहे. कमाल व किमान तापमानात मोठी तफावत असल्याने चढ-उतार दिसून येत आहे. प्रशांत महासागरातील निनाचा अभाव व हिंदी महासागरातील उष्ण पाण्यामुळे बाष्पीभवन वाढले. ज्यामुळे दिवसा उष्णता वाढते आहे. रात्री ढग नसल्यामुळे उष्णता वातावरणातून लवकर बाहेर पडते. ज्यामुळे किमान तापमानात तीव्रतेने घट होते आहे. या तापमानाचा आरोग्यावर मोठा परिणाम होतो आहे.
तापमानातील तीव्र चढ-उतारामुळे सर्दी-खोकला, डिहायड्रेशन आणि उष्णतेचे ताण यासारख्या आजारांचा धोका वाढतो आहे. बाष्पीभवनाने जलस्रोतांची पाणी पातळी घटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, अशी माहिती हवामान अभ्यासक यांनी दिली आहे.