जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२५ । जळगाव तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी तहसील कार्यालय, जळगाव यांच्यातर्फे विशेष पथकाद्वारे अहोरात्र गस्त घालून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. शासनाच्या आदेशानुसार तालुक्यातील कुठल्याही प्रकारच्या गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला मुळीच थारा दिला जाणार नाही, असा इशारा जळगावच्या तहसीलदार शितल राजपूत यांनी दिला आहे.

या पथकाद्वारे दिनांक १८ मे २०२५ रोजी गस्त घालताना दोन ट्रॅक्टर व एक हायवा ट्रक अशा एकूण तीन वाहने जप्त करण्यात आली. यामध्ये एक ट्रॅक्टर स्वतः तहसीलदार श्रीमती शितल राजपूत यांनी, दुसरे ट्रॅक्टर मंडळ अधिकारी सारिका दुर्गुडे (शिरसोली) व छाया कोळी (कानळदा भाग), तर हायवा ट्रक नायब तहसीलदार राहुल वाघ, मंडळ अधिकारी राजेश भंगाळे (जळगाव शहर) व ग्राम महसूल अधिकारी चंद्रकांत ठाणगे (भोलाणे) यांच्या पथकाने जप्त केले. ही वाहने प्रशासकीय इमारतीच्या आवारात लावण्यात आली असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई प्रस्तावित आहे.
तहसील कार्यालयामार्फत सध्या घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटप, नैसर्गिक आपत्ती पंचनामे, शेतकऱ्यांसाठीचे अॅग्री स्टॅकचे काम, विविध शासकीय योजना (जसे की संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना), पुरवठा विभागाचे रेशन कार्ड व रेशन वाटप, शैक्षणिक दाखले निर्गती, तसेच आगामी निवडणुकांचे नियोजन अशी अनेक कामे एकाचवेळी सुरू आहेत. तरीदेखील फक्त एका आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात करण्यात आलेली ही कारवाई अत्यंत उल्लेखनीय आहे.
याशिवाय, ०१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत तहसील कार्यालयाच्या पथकाकडून एकूण १०८ वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. ग्राम दक्षता समित्यांच्या माध्यमातून गावपातळीवर जनजागृती व सहभाग वाढवण्यात आला आहे. या समित्यांच्या बैठका घेऊन सदस्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
तसेच, अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या वाळुचोरांविरूध्द भारतीय दंड संहीता १०७, १०८ व ११० नुसार प्रतिबंधात्क कारवाई देखील केलेली आहे. तसेच यापुढे देखील नेमुण दिलेल्या पथकामार्फत तसेच तहसिल कार्यालयाच्या पथकामार्फत अचानक धाड टाकुन कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. नागरिकांकडुन व ग्राम दक्षता समितीतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी देखील सहकार्य करुन अवैध गौणखनीज वाहतुक रोखणेकामी शासनाची मदत करण्याबाबतचे आवाहन आवाहन तहसीलदार शितल राजपूत यांनी केले आहे.