जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहर आणि जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून, नागरिकांना चटके सोसावे लागत आहेत. काल शनिवारी तापमानाचा पारा ४२.५ अंशांवर पोहोचला असून, आगामी ४८ जळगावकरांसाठी महत्वाचे ठरणार आहे. कारण आज १० मे आणि उद्या ११ मे रोजी जिल्ह्यात तीव्र उष्ण व कोरड्या हवामानाचा इशारा दिला असून उष्णता उच्चांक गाठण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात ११ मेपर्यंत तीव्र उष्ण व कोरड्या हवामानाची स्थिती कायम राहणार आहे. केवळ हे दोन दिवसच नव्हे, तर आगामी १५ दिवस उष्णतेचा हा जोर ओसरण्याची चिन्हे नाहीत. या काळात कमाल तापमान ४१ ते ४३ अंशांच्या दरम्यान राहून दुपारच्या वेळी उष्णतेची लाट अधिक तीव्र जाणवेल.

आजपासून आगामी दोन दिवस सूर्य अधिक आग ओकण्याची शक्यता असून तापमान या हंगामातील उच्चांक गाठू शकते. वायव्य दिशेकडून वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे हवेतील आर्द्रता कमी झाली असून, त्यामुळे उकाडा आणि त्वचा कोरडी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.वायव्य दिशेकडून ताशी १५ ते २५ किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे जिल्ह्यात धुळीचे वावटळ उठण्याचीही शक्यता आहे.
दरम्यान, १० ते १४ मे दरम्यान पावसाची शक्यता अत्यंत कमी (५ ते १० टक्के) असून फक्त ढगाळ वातावरण राहील. १५ मे नंतर वातावरणात अस्थिरता वाढेल. १८ ते २० मे दरम्यान पावसाची शक्यता ४५ ते ६० टक्क्यांपर्यंत आहे. २१ ते २५ मे या काळात पाऊस ओसरून पुन्हा एकदा उष्णतेचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. मुख्य मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात दाखल होण्याचे संकेत आहेत.







