जळगाव लाईव्ह न्यूज | 28 जानेवारी 2024 | अल-निनोमुळे यंदा पावसाळा चांगला झाला नाही. त्यातच हिवाळा अद्यापही संपला नसताना जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पाणी टंचाई जाणवू लागल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणावर उचल होत आहे. ऐन हिवाळ्यातील या स्थितीमुळे यंदाच्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांना पैसे खर्च करून पिण्याचे पाणी उपलब्ध करावे लागण्याची शक्यता आहे.

यंदा जिल्ह्यातील ७० टक्के प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा नाही. सध्या स्थिती जिल्ह्यातील धरणांमध्ये जवळपास ६५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी हा जलसाठा ८१ ते ८२ टक्क्यापर्यंत होता. याचाच अर्थ यंदा १६ टक्के जलसाठा कमी असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे यंदा पाण्याचा वापर अतिशय सावधपणे करावा लागणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील चाळीसगाव, अमळनेर, जामनेर तालुक्यात पाणीटंचाईने तोंड बाहेर काढलं आहे. यामुळे प्रशासन उपाययोजना आखण्यात व्यस्त झाले आहे. हिवाळ्यातील स्थिती पाहून उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईवर कशी मात करता येईल, यादृष्टीनेही नियोजन केले जात आहे. सध्या हिवाळा सुरु आहे. अशा स्थिती टँकरसाठी ६०० ते ७०० रुपये मोजावे लागत असून मात्र उन्हाळ्यात हे दर १००० ते १२०० रुपयापर्यंत जातात. यंदा हे दर २००० रुपयांपर्यत जाण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील कोणत्या धरणात किती टक्के जलसाठा?
हतनूर- ९७.३०
गिरणा – ४१ ते ४२
वाघूर – ८६ ते ८७
सुकी- ९४ ते ९४.५०
अभोरा- ९४.०४
मंगरुळ -९२.४०
मोर- ९३.१५
अग्नावती – २९.३८
हिवरा – ५१.०२
बहुळा – ६५.६२
तोंडापूर – ८४.६७
अंजनी- ६२.३१
गूळ – ८४.३७
भोकरबारी – २७.९०
बोरी – ४८.६०
मन्याड -००