⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

जळगावकरांना दोन दिवसाआड पाणी त्यातच हजारो लीटर पाण्याची नासाडी

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२२ । शहरवासियांना मुबलक पाणी असताना देखील दोन दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागतो आहे. दरमहिन्याला दुरुस्ती आणि फुटलेल्या पाईपलाईनमुळे होणारा विलंब वेगळाच. शहरातील असोदा रस्त्यावरील एका वाचकाने जळगाव लाईव्ह पाठविलेल्या व्हिडीओ आणि फोटोमध्ये प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे हजारो लीटर पिण्याचे पाणी गटारीत वाहून गेले.

शहरात सध्या अमृत योजनेचे काम सुरु असून काही ठिकाणी नळांची देखील दुरुस्ती करण्यात येत आहे. नवीन नळ कनेक्शन देणे आणि जुने कनेक्शन काढून घेण्याचे कार्य देखील सुरु आहे. मनपाकडे नळ दुरुस्ती करणारे कर्मचारी कमी असून नागरिकांची नेहमी ओरड होत असते. अनेक ठिकाणी नळांना तोट्या नसून फुटलेल्या पाईपलाईनमुळे देखील पाण्याची नासाडी होत असते. जळगाव लाईव्हच्या एका वाचकांनी आज एक व्हिडीओ आणि काही फोटो पाठविले असून ते असोदा रस्त्यावरील आहेत.

असोदा रस्त्यावर पाईपलाईनच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाईपजोडणी योग्य पद्धतीने केलेली नसल्याने हजारो लिटर पाणी गटारीत वाहून जाताना दिसत आहे. नागरिकांकडून मनपा प्रशासनावर याबद्दल खापर फोडले जात असून दुरुस्तीची मागणी केली जात आहे. मनपा प्रशासनाची नळांना तोट्या नसल्यास कार्यवाहीची कोणतीही तरतूदच नसल्याने दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असते. विद्यमान सत्ताधाऱ्यांनी यावर मार्ग काढल्यास भविष्यात जळगावकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही हे निश्चित.

हे देखील वाचा :