⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

माझे दत्तक पुत्र करण पवारांचं आव्हान आई म्हणून स्वीकारण्यास मी समर्थ : स्मिताताई वाघ

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२४ । ऐन लोकसभा निवडणुकी तोंडावर भाजपने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश करून सहकारी करन पवार यांना जळगावमधून लोकसभेचं तिकीट मिळवून दिलं. यामुळे आता जळगावात करन पवार विरुद्ध स्मिता वाघ असा सामना रंगणार आहे. यातच स्मिता वाघ यांनी या युद्धाचं आव्हान स्वीकारलं असून करन पवार हे माझे दत्तक पुत्र आहेत. त्यांनी मला आव्हान दिल्याने आई म्हणून हे आव्हान स्वीकारण्यास मी समर्थ आहे, असं स्मिता वाघ यांनी म्हटलं आहे.

गेल्या वेळीस स्मिताताई वाघ यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र ऐनवेळी स्मिताताई वाघ यांची उमेदवारी रद्द करून उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र यावेळी उन्मेष पाटील यांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यामुळे उन्मेष पाटील हे प्रचंड नाराज झाले आणि या नाराजीतूनच त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांनी सहकारी करन पवार यांना जळगावमधून तिकीट मिळवून दिल.

यामुळे आता करन पवार विरुद्ध स्मिता वाघ सामना रंगणार असून स्मिताताई वाघ यांनीही आव्हान स्वीकारलं आहे, कोण किती काम करतो हे जनतेसमोर आहे. आम्ही जे बोलतो तेच काम करतो. जे करतो, तेच सांगतो. काळजी करू नका. जनता आमच्यासोबत आहे. त्यामुळे यावेळी सुद्धा माझ्याच रुपाने जळगावमधून भाजपचा उमेदवार विजयी होऊन संसदेत जाणार आहे, असं भाजपच्या जळगावमधील उमेदवार स्मिताताई वाघ म्हणाल्या.

उन्मेष पाटील हे माझे भाऊ आहेत. ते मला सोडून जाणार नाहीत असं मला वाटलं होतं. त्यांच्या हातावर मी रक्षाबंधनाचा धागा बांधला होता. त्यांनी त्याच हातावर आता शिवबंधन बांधलं आहे. त्यामुळे त्यांना आता त्याचं काम करावं. मी माझे काम करणार आहे. एक भाऊ सोडून गेला म्हणून काय झालं? माझ्यासोबत अनेक भाऊ आहेत. गिरीश महाजन आहेत. गुलाबराव पाटील आहेत. सगळे आमदार माझ्या पाठिशी आहेत, असं स्मिता वाघ म्हणाल्या.

उन्मेष पाटील माझा भाऊ आहे. तर करन पवार माझा दत्तक पुत्र आहे. त्यांच्याशी आता मला सामना करावा लागत आहे. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. देव-देवतांनाही नाही चुकलं ते आता काय चुकणार आहे. त्यामुळे आता माझ्या दत्तक पुत्राने (करन पवार) मला आव्हान दिल असेल, हे आव्हान स्वीकारायला आई म्हणून मी समर्थ आहे. कारण तिच्या पाठीमागे सगळे आहेत, असं त्या म्हणाल्या.

माझाच विजय होणार..
ही युद्धभूमी आहे. माझाच विजय होणार असं इथे प्रत्येकाला वाटतं. महाभारतातील कुरुक्षेत्रावरील युद्धप्रमाने एकजात सर्व माझ्यातले माझ्या विरोधात असले तरी मी आज अर्जुनाच्या भूमिकेत आहे. श्रीकृष्ण म्हणून गिरीश महाजन आणि इतर नेते माझ्या पाठिशी आहेत. माझा सर्वात मोठा पाठिराखा जनता आहे. जनता बोलण्यावर नाही तर कामावर अधिक विश्वास ठेवते. श्रीकृष्ण म्हणून युतीचे सर्व नेते, मंत्री माझ्यासोबत आहेत. त्यामुळे मी अर्जुनाच्या भूमिकेत असले तरी सर्व श्रीकृष्ण माझ्यासोबत असल्यामुळे या लढाईत माझाच विजय होईल, असा दावा वाघ यांनी केला.