जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२४ । गेल्या आठवडाभरापासून सोने-चांदीच्या दरात वाढ होत आहे. कस्टम ड्यूटी कमी केल्यानंतर सोन्याचे दर साडेतीन हजार रुपयांनी घसरले होते. ते पूर्वपदावर येऊन पुन्हा महागले. जळगावच्या सुवर्णनगरीत या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने ४०० रुपयांनी वाढून ७२,९०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे.

तर दुसरीकडे चांदीचा दर स्थिर दिसून आला. चांदी दर ८७,००० रुपये प्रति किलोवर आहे. दरम्यान, दिवाळीपर्यंत सोने ७५ हजारांचा टप्पा पार करण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे.

गेल्या जुलै महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील कस्टम ड्यूटीत कपात केल्याने सोन्याचे दर साडेतीन हजारांनी खाली येऊन ६९ हजार रुपये तोळ्यापर्यंत आले होते; परंतु गेल्या महिनाभरातच सोने पुन्हा साडेतीन हजाराने महागले आहे. तर चांदीची चायनाकडून पुन्हा मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कारणासाठी खरेदी वाढल्याचा परिणाम म्हणून दरवाढ होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
दरम्यान, अर्थसंकल्पापूर्वी सोने ७८ हजारांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज होता. मात्र, केंद्र सरकारने आपले धोरण बदलल्याचा परिणाम म्हणून दर खाली आले. मात्र, ते महिनाभरात पूर्वपदावर आले आहेत. तसे नसते झाले तर सोने आज ७८ हजार रुपयांपर्यंत पोहोचले असते. आता नोव्हेंबरपर्यंत सोने ७५ हजारांपर्यंत पोहोचू शकेल, असा अंदाज जाणकारांनी वर्तवली आहे.







