⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

‘त्या’ यादीत जळगाव जिल्ह्याचाही होणार समावेश

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२१ । अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या १४ जिल्हातील शेतकऱ्यांना २ हजार ८०० रुपयांची मदत शासनाकडून जाहीर करण्यात आली. मात्र, जळगाव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर नुकसान होऊनही जळगाव जिल्ह्याला यातून वगळण्यात आल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार किशोर पाटील यांनी याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर शासनाने जळगाव जिल्ह्याचा समावेश करून नव्याने या संदर्भातला निर्णय जाहीर करण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे या मदतीच्या यादीत जळगाव जिल्ह्याचा देखील समावेश होणार आहे.

अतिवृष्टीत नुकसान झालेल्या १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २ हजार ८०० कोटी रुपयांची मदत शासनाने नुकतीच जाहीर केली होती. मात्र जळगाव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरचे नुकसान होऊनही जळगाव जिल्ह्याला यातून वगळण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर आमदार किशोर पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन आपली भुमिका मांडली. त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा मुदा आक्रमकपणे मांडला. त्यावर शासनाने जळगाव जिल्ह्याचा समावेश करण्याबाबत मान्य केल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
हा शेतकऱ्यांवर अन्याय असल्याची भूमिका पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडल्यानंतर शासनाने जळगाव जिल्ह्याचा समावेश करून नव्याने या संदर्भातला निर्णय जाहीर करण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे या मदतीच्या यादीत जळगाव जिल्ह्याचाही समावेश होणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले . त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले.

…अन पालकमंत्र्यांची घेतली भेट
पाचोरा, भडगाव तालुक्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. त्यासंदर्भात जास्तीची मदत देण्याबाबत आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे मागणी केली होती. त्यानंतर एसडीआरएफच्या दरापेक्षा अधिक मदत देण्याचे शासनाने जाहीर केले होते. दरम्यान, शासनाने मदत जाहीर केली, मात्र त्यात जळगाव जिल्ह्याला वगळण्यात आल्याचे समजताच आमदार किशोर पाटील यांनी तात्काळ मुंबईत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. यावेळी आमदार किशोर पाटील यांचे स्विय सहाय्यक राजेश पाटील, पाचोऱ्याचे नगराध्यक्ष संजय गोहिल आदी उपस्थित होते.