जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२५ । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात 100 दिवसांच्या विशेष कार्याल यीन सुधारणा मोहिमेच्या 1 मे दिवशी निकाल घोषित झाला असून जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने राबवलेल्या 100 दिवसांच्या विशेष कार्यालयीन सुधारणा मोहिमेला राज्यस्तरावर तृतीय क्रमांकाचा बहुमान मिळाला आहे. नागरिकाभिमुख सेवा, कार्यालयीन कार्यपद्धती सुधारणा आणि डिजिटल गव्हर्नन्स यावर भर देत जिल्ह्यात सकारात्मक परिवर्तन घडवण्यात आले.

‘जळगाव संवाद’ या ऑडिओ-व्हिज्युअल पद्धतीच्या तक्रार निवारण यंत्रणेमुळे नागरिक थेट अधिकाऱ्यांशी संवाद साधू लागले आहेत. ‘शेतसुलभ योजना’ अंतर्गत तुकडा नोंदींचे प्रकरण सोडवून शेतकऱ्यांना थेट लाभ देण्यात आला. ‘JIVANT’ मोहिमेमुळे मृत व्यक्तींची नावे विविध शासकीय यादीतून वगळण्यात यश आले.
‘डॉ. आयुष प्रसाद’ यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील सर्व महसूल कार्यालयांमध्ये जवळपास 23000 जुन्या संचिकाचे वर्गीकरण करून अभिलेख जमा.
नागरिकांना अर्ज करण्यासाठी जळगाव वेबसाईट वर सुविधा उपलब्ध करुन दिली. कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यालयीन कामासाठी वापर.
कर्मचाऱ्यांची सर्व आस्थापना विषयक प्रश्न निकाली काढले.
‘ई-ऑफिस’ प्रणाली अंमलात आणली गेली. यामुळे १६,००० हून अधिक फाईल्स जलद गतीने निकाली काढल्या गेल्या. ई-क्वासी-ज्यूडिशियल प्रणालीमुळे ऑनलाईन सुनावणी व आदेश वितरण सुरू झाले आहे. दूरदृष्टी ठेवून जिल्ह्यातील हवाई संपर्क वाढवण्यातही यश मिळाले. UDAN योजनेअंतर्गत जळगाव ते मुंबई, पुणे, गोवा, हैदराबाद व अहमदाबाद दरम्यान हवाई सेवा सुरू झाली असून जवळपास १ लाख प्रवाशांना याचा लाभ झाला आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती १० लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली. दर आठवड्याला घेतलेल्या बँक समन्वय बैठका, शेतकरी-गुंतवणूकदार संवाद, आणि पाण्याचे व्यवस्थापन यामुळे बहुआयामी परिणाम साधता आले.
राज्य शासनाच्या मूल्यमापनात जळगाव जिल्ह्याने कार्यालयीन सुधारणांमध्ये ठसा उमठवत राज्यात तिसरे स्थान पटकावले आहे. जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली ही सुधारणा मोहीम “कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख प्रशासनाचा आदर्श” ठरली आहे. या यशासाठी केंद्रिय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जळगावच्या खा. स्मिता वाघ, जिल्ह्यातील सर्व आमदार या सर्वांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा प्रशासनाचे या कामगिरीसाठी विशेष अभिनंदन केले आहे.